घरकुलाचे प्रस्ताव मार्चपूर्वी निकाल काढण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST2021-03-09T04:15:46+5:302021-03-09T04:15:46+5:30
अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेतील उद्दिष्टांनुसार जिल्ह्यातील सर्व बेघर व्यक्तींना घरे मिळवून देण्यासाठी ‘मिशन मोड’वर कामे करून ३१ ...

घरकुलाचे प्रस्ताव मार्चपूर्वी निकाल काढण्याचे आदेश
अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेतील उद्दिष्टांनुसार जिल्ह्यातील सर्व बेघर व्यक्तींना घरे मिळवून देण्यासाठी ‘मिशन मोड’वर कामे करून ३१ मार्चपूर्वी घरकुल मंजुरी व इतर प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी यंत्रणेला दिले आहेत. याकरिता बेघरांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी यंत्रणेसोबत प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील आवास योजनेच्या कामांचा पालकमंत्र्यांनी 'झूम'च्या माध्यमातून बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीराम कुलकर्णी, गटविकास अधिकारी आदींनी बैठकीत सहभाग घेतला. घरकुल योजनेत जिल्ह्याची कामगिरी फारशी समाधानकारक दिसत नाही. ही स्थिती सुधारण्यासाठी योजनेचे उद्दिष्ट १०० टक्के काम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे यंत्रणेतील गटविकास अधिकाऱ्यांनी गावोगाव भेटी देऊन गरजू नागरिकांना घरकुल मंजुरीची प्रक्रिया राबवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बॉक्स
कुचराई केल्यास कारवाई
जी अतिक्रमणे नियमानुकूल झालेली नाहीत, त्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी महसूल विभागाकडे पाठपुरावा करून नियमानुकूल करून घ्यावी. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडून एका आठवड्याच्या आत १०० टक्के प्रकरणे निकाली काढावी व घरकुले मंजूर करावी. याबाबत प्रस्ताव पाठविण्यात कुचराई केल्यास गटविकास अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.