सोलर पंपांसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:25 IST2016-09-08T00:25:24+5:302016-09-08T00:25:24+5:30
जिल्ह्यात सोलर पंप वीज जोडणीसाठी शासनाकडूम 35 हजार रूपये अनुदान दिले जाते ...

सोलर पंपांसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा
पालकमंत्री : महावितरण कंपनीची आढावा बैठक
अमरावती : जिल्ह्यात सोलर पंप वीज जोडणीसाठी शासनाकडूम 35 हजार रूपये अनुदान दिले जाते व सौरऊर्जेवर चालत असल्यामुळे सोलर पंपाची उपयुक्तता तुलनेने जास्त आहे. म्हणून शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे व याबाबतीत जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित महावितरण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता गाडीकर, कार्यकारी अभियंता मोहोड यांच्यासह सर्व जिल्ह्यातील महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. १७०० सोलर पंपांसाठी जिल्ह्यात मान्यता मिळाली असून फक्त ४८६ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. सोलरपंपांना जिल्ह्यात मिळालेली मान्यता व आलेले अर्ज यामध्ये तफावत असून त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यामध्ये आतापर्यत १२ हजार कृषीपंपाचे कनेक्शन दिले असून कृषीपंपांच्या प्रलंबित कनेक्शनची संख्या कमी करण्यामध्ये यश आल्याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावर्षी रबी हंगामात शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत सुरु राहावा, म्हणून २०० अतिरिक्त डीबींची मागणी केली आहे व ४०० डीबींची साठवण करुन ठेवली आहे. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणे हे शासनाचे प्राधान्य असुन अमरावती स्मार्ट सिटीसाठी १३०कोटी रुपयाचा स्मार्ट ग्रिड आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामधून भूमिगत वीज कनेक्शन जोडण्यासाठी भुयारी मागार्चा वापर करण्यात येणार आहे. इन्फ्रा २ टप्प्याच्या कामाची माहिती देखील पालकमंत्र्यांनी घेतली.
यावेळी अचलपूर विभागात कृषीपंपांचे वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पथदिवे व पाणीपुरवठ्याचे कनेक्शनही लवकर देण्याचे, ग्राहकांचे तक्रारी वेळेत सोडविण्याचे, व मुख्यालयी थांबण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत (प्रतिनिधी)