आज घराघरात होणार गौरीचे आगमन

By Admin | Updated: September 8, 2016 00:26 IST2016-09-08T00:26:25+5:302016-09-08T00:26:25+5:30

गणपतीच्या आगमनानंतर येणाऱ्या माहेरवाशिणींच्या स्थापनेसाठी घराघरात जय्यत तयारी झाली असून...

Gauri arrives in the house today | आज घराघरात होणार गौरीचे आगमन

आज घराघरात होणार गौरीचे आगमन

तीन दिवस चैतन्यमयी वातावरण : पूजा-अर्चा, महानैवेद्य शुक्रवारी 
मोहन राऊत धामणगाव रेल्वे
रूणुझुणत्या पाखरा
जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी
घाली लिंबलोण सडा
गणपतीच्या आगमनानंतर येणाऱ्या माहेरवाशिणींच्या स्थापनेसाठी घराघरात जय्यत तयारी झाली असून तीन दिवस या माहेरवाशिणी कुटुंबात सौख्य, समृद्धी व अखंड सौभाग्य प्राप्त करून देण्यासाठी घराघरात गौरीचे आगमन होत असून नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे़
भाद्रपद महिन्याच्या मूळ नक्षत्रात तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो़ पहिल्या दिवशी गौरींचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजा-अर्चा व तिसऱ्या दिवशी सौभाग्य लेणे देण्यात येते़ पौराणिक काळात कोलासूर नावाचा दुष्ट राक्षस स्त्रियांना अतिशय त्रास द्यायचा. सर्व स्त्रिया कंटाळून अखेर ब्रह्मा विष्णू, महेश यांच्याकडे गेल्या. तेव्हा परमेश्वराने कोलासूर राक्षसाचा नाश करण्याची जबाबदारी महालक्ष्मी देवीवर सोपविली. देवीने कोलासूर राक्षसाशी यु्द्ध करून त्यांचा वध केला़ व स्त्रियांना त्यांच्या त्रासापासून मुक्त केले़, अशी आख्यायिका आहे़
गौरी स्थापना वेगवेगळ्या प्रकारे करतात विहिरीवरून तिला वाजत-गाजत आणणे घरच्या सर्व भागात फिरविणे, प्रत्येक ठिकाणी रांगोळीची पाऊले रेखाटणे एखाद्या वाटीत पाच किंवा सात खडे आणून गौराईचे पूजन करणे अशा पद्धतीने पूजन केले जाते. विदर्भात उभ्या महालक्ष्मींचे पूजन केले जाते. काही ठिकाणी नुसते मुखवटे तर काहींच्या घरी बैठ्या गौरी असतात तर अनेक कुंटंूबात महालक्ष्मींना पितळी किंवा लाकडी तथा लोखंडी स्टँडवर उभ्या करतात़ काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे तर पितळेचे तसेच लाकडाचे असतात़ अनेक ठिकाणी हात नसण्याची सुद्धा पध्दत आहे़
दोन गौरींना ज्येष्ठा व कनिष्ठा असे संबोधून दोघींच्यामध्ये एक बाळही ठेवतात. गव्हाच्या व तांदळाच्या राशी तिच्यापुढे मांडतात़ नवीन साड्या, नवीन मुकूट, गळ्यातील अलंकार, बागड्या, साड्यांचा असा सर्व नवा थाट पाहून डोळ्यांचे पारणे फिटते़ साड्या, गहू, तांदळाची रास, ओटी, फराळाचे पदार्थ, समोर ठेवण्यात येत असले तरी पहिल्या दिवशी अशा समृद्धीने सजलेली महालक्ष्मी तथा गौरी ही भाजी व भाकरीच्या नैवद्याने तृप्त होते़ पहिल्या दिवशी जागरण करून रात्रील जागविल्या जातात. नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अथवा सायंकाळी महालक्ष्मींना बंद दार करून जेवण देण्यात येते़ अक्षरश: वाढलेल्या प्रसादात बोटांचे ठसे दिसत असल्याचे अनेकांनी सांगितले़ या दिवशी आंबील व प्रसादाला अधिक महत्त्व असते़ तिसऱ्या दिवशी राशीचा प्रसाद या कुटूंबात मित्र परिवारांना देण्यात येतो.

Web Title: Gauri arrives in the house today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.