शेतकऱ्यांना नाडवणारे महाठक गजाआड
By Admin | Updated: November 5, 2016 00:08 IST2016-11-05T00:08:02+5:302016-11-05T00:08:02+5:30
शासकीय योजनांमधून शेतकी साहित्य देण्याची बतावणी करून शेतकऱ्यांना ठकविणाऱ्या दोन महाठकांना गुन्हे शाखेने गजाआड केले आहे.

शेतकऱ्यांना नाडवणारे महाठक गजाआड
बतावणी : परजिल्ह्यातही नेटवर्क
अमरावती : शासकीय योजनांमधून शेतकी साहित्य देण्याची बतावणी करून शेतकऱ्यांना ठकविणाऱ्या दोन महाठकांना गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. किशोर हरिचंद्र भुगूल (३८, सावनेर) आणि राजेश गंगाधर बंड (४५, खरवाडी) यांचा अटक केलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे.
गतवर्षी जिल्हा परिषद कार्यालयामधून चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास करताना हे दोन महाठक गुन्हे शाखेच्या रडारवर आलेत. चोरीच्या दुचाकींचा वापर करून त्यांनी पंचायत समितीचे अधिकारी असल्याची बतावणी केली व अमरावती जिल्ह्यासह वर्धा, वाशिम, यवतमाळ, अकोला, नागपूर, भंडारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन ते चार लाख रुपयांनी नाडवले. साईनगर येथील संजय धोटे यांची एम.एच. २७ ए.के. ४५३२ ही दुचाकी जिल्हा परिषद आवारातून सन २०१५मध्ये चोरीला गेली.
चोरीच्या तपासाने दिली दिशा
अमरावती : त्या चोरीचा तपास करत असताना ते वाहन सावनेर येथील एका इसमाकडे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेने सावनेर गाठले.
त्याला दुचाकीबाबत व अन्य फसवणुकीबाबत विचारणा केली असता, त्याने राजेश बंड नामक अन्य एका सहकाऱ्याची माहिती दिली. दोघांनी मिळूनच दीड वर्षांपूर्वी ही दुचाकी चोरी केली.
त्यानंतर ग्रामीण भागातून एक मोबाईल लंपास केला. सात ते आठ महिन्यांपासून कामुंजा, पुसदा, शिराळा, वलगाव, पूर्णानगर, माहुली जहांगिर, मंगरुळ, धानोरा, माना, कुरूम, कुऱ्हा, दर्यापूर येथील गरीब व गरजू शेतकऱ्यांना त्यांनी पंचायत समिती अधिकारी आणि कर्मचारी असल्याची बतावणी केली तथा पंचायत समितीच्या ज्या योजनांमधून स्प्रिंक्लर संचाकरिता १२ हजार ३०० रुपये, टीनपत्रे व ताडपत्रीकरिता १८०० रुपये आणि शिलाई मशीनसाठी ९३० रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. मागील दीड वर्षापासून त्यांनी वर्धा, वाशीम, यवतमाळ, अकोला, नागपूर, भंडारा जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील ५० ते ६० शेतकऱ्यांची तीन ते चार लाख रुपयांनी फसवणूक केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व मोबाइलचा पोलिसांना पत्ता लागू नये म्हणून दोन्ही आरोपींनी दुचाकी व मोबाइल अंजनगाव ते मार्डी रस्त्यावर बेवारस स्थितीत सोडून दिले. ते ठिकाणसुद्धा आरोपींनी पोलिसांना दाखविले. दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीसुद्धा दुचाकी चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, कामुंजा येथील श्रीकांत माणिक बनसोड यांच्या लेखी तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
महाठक किशोर भुगूल
राजेश बंड या आरोपीच्या तुलतेन किशोर भुगूल हा फसवणुकीचा मास्टर माइंड असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. तो अत्यंत धूर्त असून त्याने स्वत:ची ओळख लपवून शेतकऱ्यांना नाडवले आहे. ठाकरे, मेश्राम, बडगे अशा विविध आडनावांचा वापर त्याने पंचायत समितीचा अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी केला. पोलिसी हिसका दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पांडेंच्या पथकाची कारवाई
गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. आयुक्तालय हद्दीतील वाढत्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा तपास सुरू असताना हा प्रकार उघड झाला. पांडे यांच्या समवेत उपनिरीक्षक प्रवीण पाटील, दिलीप वाघमारे, जमादार संजय बाळापुरे, सुभाष पाटील, नीलेश जुनघरे, संग्राम भोजने, अमर बघेल, दर्शना वानखडे आदींनी ही कारवाई केली.