डिसेंबरमध्ये थेट मोदींच्या घरावर मोर्चा
By Admin | Updated: September 2, 2016 00:13 IST2016-09-02T00:13:32+5:302016-09-02T00:13:32+5:30
शेतकरी, शेतमजुरासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतमालाला रास्त भाव द्या, अपंगाचा शेष भरून काढा...

डिसेंबरमध्ये थेट मोदींच्या घरावर मोर्चा
बच्चू कडूंची घोषणा : अंबाड्यात जाहीरसभा, लक्षणीय उपस्थिती
अंबाडा : शेतकरी, शेतमजुरासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतमालाला रास्त भाव द्या, अपंगाचा शेष भरून काढा या मागणीसाठी ३१ डिसेंबर २०१६ ला गुजरातमधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा नेणार असल्याची घोषणा आ. बच्चू कडू यांनी येथे सोमवारी आयोजित जाहीरसभेत केली.
सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रवींद्र लकडे होते. यावेळी मंचावर माजी जि.प. सदस्य अनिल खांडेकर, धोटे, श्रीवास, मुरलीधर पिसे, ज्ञानेश्वर कडू, ज्ञानेश्वर कोकरे, हारुणभाई, उपसरपंच रेखा कोकरे, मंजुषा खांडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी समाजसेवक मुरलीधर पिसे यांचा सन २०१६ मध्ये शासनातर्फे घोषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संघर्ष बहुउद्देशीेय संस्थतर्फे गौरव करण्यात आला. आ. बच्चू कडू पुढे म्हणाले की, भगवा, निळा आणि हिरव्या झेंड्याखाली राजकीय नेते शेतकऱ्यांची अडवणूक करतात. जातीधर्माचे राजकारण करून जातीधर्मात भांडणे लावतात. शेतकरी सुद्धा यात होरपळतो. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचत नाही.
शेतकऱ्यांच्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे, असे स्वामीनाथन आयोगात सरकारने म्हटले आहे. पण कापसाला ४५०० रुपये भाव देवून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाविरोधात लढ्या द्यावा, मी तुमच्या सोबत आहे, असेही आ. कडू म्हणाले. संचालन संतोष बिजवे यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमासाठी गजानन देशभ्रतार, राजू कोकरे, नितीन खोडस्कर, अनिल पठाण, दीपक घाटोळ यांनी प्रयत्न केले. या सभेला पसिरातील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती. बच्चू कडूंनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.(वार्ताहर)