भीषण आगीत चार घरे खाक
By Admin | Updated: February 23, 2017 00:13 IST2017-02-23T00:13:29+5:302017-02-23T00:13:29+5:30
अचानक लागलेल्या भीषण आगीत जळका हिरापूर गावातील चार घरे जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

भीषण आगीत चार घरे खाक
लाखोंचे नुकसान : जळका हिरापूर येथील घटना
अमरावती : अचानक लागलेल्या भीषण आगीत जळका हिरापूर गावातील चार घरे जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत चार गावकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.
भातकुली तालुक्यातील नया अकोला रोडवरील जळका हिरापूर येथे दुपारच्या सुमारास एका घराला आग लागली. आगीने काही वेळात भिषण रुप धारण केल्यामुळे काही वेळात आगीने अशोक गोपाळ भुसारी, नरेंद्र भुसारी, गोवर्धन देशमुख व रामचंद्र वाकोडे यांच्या घराला विळख्यात घेतले.
या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे वाहनचालक फाईक खान, फायरमन किशोर शेंडे, शिवा आडे व हजारे यांनी पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले. त्यांनी पाण्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केल्यानंतर तब्बल दिड तासाने आग नियंत्रणात आली. या घटनेमुळे वलगाव परिसरात खळबळ उडाली होती. आगीची माहिती गावखेड्यात पसरताच शेकडो नागरिकांनी जळका हिरापुर गावात बघ्याची गर्दी केली.
रोहनखेडमध्ये घर, टोलनाक्यावर कार जळाली
नांदगाव पेठजवळील रोहनखेड गावात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुरेश अंबाडेकर यांच्या पडीत घरातील कडबा-कुटाराला अचानक आग लागली. आगीने भीषण रुप धारण करून अंबाडेकर यांच्या घरालाही विळख्यात घेतले होते. तर नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ उभ्या असलेल्या कार (एमएच २७/एसी/८०२४)ने अचानक पेट घेतला. यात ती कार भस्मसात झाली. मंगेश नागमोते यांची ती कार होती.