भरारी पथक कुचकामी
By Admin | Updated: June 22, 2014 23:47 IST2014-06-22T23:47:02+5:302014-06-22T23:47:02+5:30
बनावट बियाणे विक्रीच्या घटना ठिकठिकाणी उघडकीस येत असून शेतकऱ्यांची नाहक लूट सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी गठित करण्यात आलेले

भरारी पथक कुचकामी
बनावट बियाणे विक्रीला उधाण : कारवाई नाही, ‘फिक्सिंग’ झाल्याची चर्चा
अमरावती : बनावट बियाणे विक्रीच्या घटना ठिकठिकाणी उघडकीस येत असून शेतकऱ्यांची नाहक लूट सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी गठित करण्यात आलेले जिल्हास्तरावरील भरारी पथक कुचकामी ठरल्याचे दिसते. बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटशी या भरारी पथकाचे संधान तर नाही ना, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
जिल्ह्याच्या सरासरी पेरणी क्षेत्रापैकी ८० टक्के पेरणीक्षेत्र सोयाबीन व कपाशीचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी कपाशी व सोयाबीनच्या बनावट बियाण्यांची खुलेआम विक्री होत आहे. या प्रकाराला पायबंद घालण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून जिल्ह्यात नेमण्यात आलेले १५ भरारी पथक सपशेल अपयशी ठरले आहेत.
खरीप हंगाम २०१४ साठी जिल्ह्यात ७,०२,२०० हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. यापैकी ३,७३,००० क्षेत्रात सोयाबीन व १,५९,००० हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
खरीप २०१३ च्या तुलनेत यंदा २९,६०० हेक्टरने कपाशीचे पेरणीक्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे बीटी बियाण्यांना मागणी वाढली आहे. हे हेरून बनावट बीटी बियाणे बाजारात दाखल झाले आहेत. विनाप्रक्रिया बाजारात विक्रीसाठी आलेल्या या बनावट बियाण्यांच्या उगवणक्षमतेची कुठलीच खात्री नसते. अन्य राज्यातून छुप्या मार्गाने हे बनावट बियाणे जिल्ह्यात दाखल झाले असताना कृषी विभागाने नेमलेली तालुकास्तरीय १४ व जिल्हास्तरीय १ अशी १५ पथके मात्र अस्तित्वहीन ठरली आहेत. या पथकांकडून एक अपवाद वगळता कुठेही कारवाई नाही.
शुक्रवारी वरूड तालुक्यातील घोराड येथे मलिका ५५ व बिगबॉल बी.जी.३ तसेच वोलगार्ड तणनाशक बीटी, या बनावट कंपन्यांची ६३ पाकिटे जप्त केली.
जिल्ह्यात धामणगाव, मोर्शी व वरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट बीटी बियाण्यांची विक्री होत आहे. परंतु तालुकास्तरीय पथकांद्वारे कुठलीही कारवाई होत नसल्याने भरारी पथकांचे बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांसोबत ‘फिक्सिंग’ झाले काय? असा सवाल शेतकरी करीत आहेत.
मागील खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले. सोयाबीनची प्रतवारी कमी झाली. सोयाबीन पावसात ओले झाल्याने त्याला कीड लागली होती. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची टंचाई आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ८८ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व खासगी कंपनीकडून केवळ १ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध होणार आहेत. परिणामी ८८ हजार क्विंटल बियाण्यांची यंदा कमतरता भासणार आहे. त्यामुळे बाजारातील सोयाबीन विकत घेऊन नामवंत कंपनीच्या नावाने विकण्याचा गोरखधंदा सुरू झाला आहे.
असेच ३८ लाख रूपयांचे बनावट सोयाबीन बियाणे शुक्रवारी २० जीन रोजी अकोट येथे विभागीय भरारी पथकाने पकडले. याच ठिकाणावरून चार ट्रक बियाणे बाजारात विक्रीला पाठविण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे बनावट बियाणे विकत घेऊन शेतकऱ्यांची फसगत होणार आहे. सर्वच तालुक्यात बनावट बियाण्यांची सर्रास विक्री होत असताना जिल्ह्यातील सर्व भरारी पथके मात्र याकडे डोळेझाक करीत आहेत. मुळात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनाच बनावट बियाण्यांविषयी गांभीर्य नसल्याने शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. (प्रतिनिधी)