पाच हजार एकरांतील पीक नष्ट

By Admin | Updated: July 9, 2016 23:55 IST2016-07-09T23:55:44+5:302016-07-09T23:55:44+5:30

जिल्ह्यात मागील २४ तासांत चांदूररेल्वे, चिखलदरा व धामणगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली.

Five thousand acres of crop destroyed | पाच हजार एकरांतील पीक नष्ट

पाच हजार एकरांतील पीक नष्ट

तीन तालुक्यांत अतिवृष्टी : नदी-नाल्यांना पूर; खोलगट भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
अमरावती : जिल्ह्यात मागील २४ तासांत चांदूररेल्वे, चिखलदरा व धामणगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. या तालुक्यातील पाच हजार एकर शेतात पाणी साचल्याने पिके धोक्यात आली आहे. वर्धा नदीला पूर आल्याने वरूड ते पांढुर्णा मार्गावरील वाहतूक शुक्रवारी रात्री चार तास बंद होती. निम्न वर्धा व विश्रोळी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने खोलगट भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातून पाण्याची आवक वाढल्याने वर्धा नदी दुथडी वाहत आहे. धामणगाव तालुक्याील विदर्भा, तिवसा तालुक्यातील पिंगळा, धारणी तालुक्यातील सिपना नदीचे व परिसरातील नाल्यांचे पाणी काठालगतच्या शेतात शिरले आहे. तसेच संततधार पावसाने अनेक शेतात रातोरात तळी साचून पेरणी झालेली व पिके निघालेली शेती धोक्यात आली आहे. जिल्ह्यात गत २४ तासांत ५८.६ मि. मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १३२.४ मि.मी. धामणगाव, ८५.४ चिखलदरा व ८२.६ मि. मी. चांदूररेल्वे तालुक्यात पाऊस पडला ही अतिवृष्टी आहे. या खालोखाल ६४.२ अमरावती, भातकुली ३९.८. नांदगाव ६१.४, तिवसा ५१.२, मोर्शी ३९.१, वरूड ३७, अचलपूर ५५.३, चांदूरबाजार ५०, दर्यापूर २३, अंजनगाव ४२, धारणी ५७.२ व चिखलदरा तालुक्यात ८५.४ मि. मी. पाऊस पडला आहे. १ जून ते ९ जुलैदरम्यान २२६.३ मि.मी. पावसाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात३२८.७मि.मी. पाऊस झाला.

पावसाचा जोर कायम राहणार
अमरावती : मध्यप्रदेशात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव थोडा कमी झाला असला तरी स्थिरता कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यासह विदर्भात काही दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सर्वाधिक ४९८.४ मि.मी. पाऊस पडला. मोर्शी ४४७, धामणगाव ४०८.६, अमरावती २८३.५, भातकुली २३१.८ नांदगाव खंडेश्वर ३१०.५, चांदूररेल्वे ३६३.५, वरूड २८०.१, अचलपूर ३००.९, चांदूरबाजार ३५६.९, दर्यापूर २७२.८, अंजनगाव सुर्जी २५७.६ व चिखलदरा तालुक्यात ३३३.२ मि. मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात पावसाची टक्केवारी १४५.३ आहे. यामध्ये अमरावती १३८, भातकुली १०५, नांदगाव १४१, चांदूररेल्वे १६७, धामणगाव १८९, तिवसा २३१.३, मोर्शी १९९.५, वरूड १०८, अचलपूर १४५, चांदूरबाजार १७७, दर्यापूर १४४ व अंजनगाव तालुक्यात १५६ टक्के पाऊस पडला. या १२ तालुक्यांनी पावसाची टक्केवारी पार केली. चिखलदरा ९३०५ व धारणी ९४.३ हे तालुक्ये सरासरीत आहेत.

धामणगाव तालुक्यातील शेती पाण्यात
तालुक्यात दोन दिवसांपासून पडलेल्या संततधार पावसाचे पाणी सुमारे दीड हजार हेक्टरमध्ये साचले. मात्र महसूल प्रशासनातील गावांचा मुख्य दुवा असलेला तलाठी बेपत्ता झाला आहे़ हजारो रूपयांचे बियाणे पेरणी केल्यानंतर पीक बुडाल्याने सर्व्हेक्षण कोण करणार, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे. तहसीलदार चंद्रभान कोहरे यांनी सर्व तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची सूचना दिली असतानादेखील अनेक गावात तलाठी उपस्थित नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पाणी साचलेल्या शेतीचे सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे़ या शेतकऱ्यांनी हजारो रूपयांचे बियाणे शेतात टाकले व आता पावसामुळे आपल्या शेतातील बियाणेच नव्हेतर पिकेदेखील पाण्याखाली आली. त्यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना शासन मदतीची आस लागली आहे़

वरूड-पांढुर्णा राज्य मार्ग चार तास बंद
मध्यप्रदेशात झालेली अतिवृष्टी व तालुक्यात गेल्या ४८ तासात झालेला संततधार पाऊस यामुळे वरूड तालुक्यात वर्धा नदीला शुक्रवारी रात्री पूर आला. त्यामुळे मध्यप्रदेशात जाणारा वरुड पांढुर्णा मार्गावरची वाहतूक चार तास ठप्प होती. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील राजुराबाजार राजस्व मंडळातील ७ घरांची अशंत: पडझड होऊन नुकसान झाले, तर बेलोरा परिसरातील शेतीचे पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लोणी मंडळामध्ये ४ हेक्टर ९० आर. शेतीचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. राजुरा राजस्व मंडळातील हातूूर्णा , आलोडा, आणि नांदगाव परिसरातील ७ घरांची अंशत: पडझड झाली. तर लोणी मंडळातील बेलोरा परिसरातील ४ हेक्टर ९० आर. शेतजमिनीचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले.

विश्रोळी धरणाचे नऊ दरवाजे उघडले
दोन दिवसांपासून धरणक्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने चांदूरबाजार तालुक्यामधील विश्रोळी धरणाचे ९ दरवाजे १० सें.मी. ने उघडले आहे. तसेच वर्धा नदीला पूर असल्याने निम्नवर्धा धरणाचेदेखील दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे खोलगट भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

दोन दिवस झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. तेथील सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे.
- वीरेंद्र जगताप,
आमदार, धामणगाव रेल्वे

मध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्याने वर्धा नदी दुथडी वाहत आहे. जिल्ह्यात काही तास खंड देऊन पाऊस होत असल्याने पिकाचे एवढे नुकसान झालेले नाही.
- किरण गित्ते,
जिल्हाधिकारी, अमरावती

शेतकऱ्यांनी शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करावयास पाहिजे. २४ तासांवर पाणी शेतात साचले सअल्यास पिके पिवळी पडू शकतात. पाणी साचल्याने पिकांची मुळे सडतात. यासाठी पाण्याचा निचरा करून नजिकच्या कृषी कार्यालयात सल्ला घ्यावा.
- दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Five thousand acres of crop destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.