वनविभागाने जप्त केलेल्या पाच गाई चोरांनी पळविल्या
By Admin | Updated: July 23, 2015 00:28 IST2015-07-23T00:18:08+5:302015-07-23T00:28:29+5:30
बदरझिरा वनक्षेत्रातून जप्त केलेल्या पाच गायी चोरांनी पळविल्याची घटना रविवारी वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात घडली.

वनविभागाने जप्त केलेल्या पाच गाई चोरांनी पळविल्या
पोलिस ठाण्यात तक्रार : वनकर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात
अमरावती : बदरझिरा वनक्षेत्रातून जप्त केलेल्या पाच गायी चोरांनी पळविल्याची घटना रविवारी वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात घडली. वनकर्मचाऱ्यांच्या संगमताने आरोपींनी गायीची चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याघटनेची तक्रार वनविभागाने फे्रजरपुरा पोलिसांकडे दिली आहे.
वडाळी वनपरिक्षेत्रातंर्गत बंदरझिरा वनक्षेत्रात शनिवारी दुपारी चराई करताना पाच गायीना वनविभागाने ताब्यात घेतले होते. त्या पाचही गायीना वडाळी रोपवाटिकेत बंदीस्त ठेवण्यात आले होते. गायीवर पाळत ठेवण्यासाठी वनविभागाने चार कर्मचारी सुध्दा तैनात केले होते. मात्र, रविवारी मध्य रात्रीतून पाचही गायी अज्ञात चोरांनी पळून नेल्याचे आढळून आले. चोरट्यांनी तारेचे कम्पाऊंड कटरने कापून गायी ठेवलेल्या खोलीचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गायी पळवुन नेल्या अशी तक्रार आहे.
लिलावात आलेल्या काठेवाडींवर संशय
गेल्या काही दिवसात वनविभागाने अवैध चराई करणारे जनावरे ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव केला होता. त्यावेळी अनेक काठेवाडी नागरिक जनावरे खरेदीकरिता वनविभागाच्या कार्यालयात आले होते. त्यामुळे त्या काठेवाडींनी वडाळी परिसराची पाहणी केली, असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यापैकी काही जणांनी आरएफओ पी.के. लाकडे यांना फोन करून गुरांबाबत माहिती विचारली होती. त्यामुळे फोन करणाऱ्यांचे मोबाईल क्रमांकाची चौकशीही वनविभागाने सुरु केली आहे.