जिल्ह्यात 'अच्छे दिन'ची पहिली पुण्यतिथी
By Admin | Updated: May 27, 2015 00:14 IST2015-05-27T00:14:49+5:302015-05-27T00:14:49+5:30
केंद्रात सत्तारुढ असणाऱ्या भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सत्तेत येऊन एक....

जिल्ह्यात 'अच्छे दिन'ची पहिली पुण्यतिथी
निषेध आंदोलन : सरकारने एक वर्षातच गोरगरिबांचे कंबरडे मोडल्याचा काँग्रेसचा आरोप
अमरावती : केंद्रात सत्तारुढ असणाऱ्या भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्यावरही केली नसल्यामुळे नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या सरकारच्या 'अच्छे दिन' कार्यक्रमाची पहिली पुण्यतिथी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी जाहीर निषेध करीत पार पडली. या आंदोलनात जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात अचलपूर व चांदूरबाजार येथे आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात वलगाव व तिवसा येथे आंदोलन करण्यात आले. याशिवाय जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांच्या ठिकाणी तालुका व शहर काँग्रेसच्या अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी निषेधात्मक आंदोलन केले. शहरातही शहर काँग्रेसच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. हे सरकार गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यात सपेशल अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.
मोदी सरकारच्या विरोधात वलगावात चक्काजाम
टाकरखेडा (संभू) : मोदी सरकारने एका वर्षात सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या तसेच नोकरदार वर्गाच्या अपेक्षापूर्ती केली नाही. याच्या निषेधार्थ यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भातकुली व अमरावती तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने केंद्र सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणाची पुण्यतिथी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत वलगाव येथे साजरी करण्यात आली.
मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांमध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस स्वस्त करणार, जीवनावश्यक वस्तूंची महागाई रोखणार, दरवर्षी २.५ कोटी नोकऱ्या देणार, औषधी स्वस्त करणार, विदेशातील काळा पैसा १०० दिवसांत परत आणणार, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रूपये टाकणार, शेतीच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा, किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अभूतपूर्व मदत, पाकिस्तान एक मारेल तर आम्ही दहा मारू, दहशदवाद विरोधात कठोर कारवाई, चीनला वठणीवर आणणार इत्यादी आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे मोदी सरकार पुण्यतिथी महोत्सव आज वलगाव येथे साजरा करण्यात आला. यामध्ये पुण्यतिथी कार्यक्रमाला आ. यशोमती ठाकूर, भातकुली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकद्दरखाँ पठाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मोहोड, जि. प. सभापती सरिता मकेश्वर, पं.स. सदस्य जयंत देशमुख, विकास इंगोले पाटील, मनोज देशमुख, प्रकाश साबळे, जि.प. सदस्य कोकीळा पवार, जि.प. सदस्य विनोद डांगे, इंदुताई कडू, ऐनुल्ला खान, राजू गंधे, अशोक गंधे, सोमेश्वर गावंडे, अभय देशमुख, अमरावती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप रिठे, श्याम देशमुख, राजू कुऱ्हेकर, राजू निर्मळ, सुधीर उगले, श्याम गावंडे, अलकेश काळबांडे, प्रकाश कोकाटे, प्रकाश बनारसे, गिरीश देशमुख, पंकज देशमुख, नरेंद्र मकेश्वर, विजय मकेश्वर, रफीकभाई, राजेश ठाकरे, ज्योती ठाकरे, शशीकांत खोब्रागडे, नौशाद पठाण, उमेश वाकोडे, शशीकांत बोंडे, चंद्रशेखर गेडाम, नीलेश कडू, सुरेश भुयार, विठ्ठल मोहोड, वहीदभाई, नितीन कटकतलवारे, राजू कुऱ्हे, विठ्ठल मदने, मंगेश तायडे, बबलू तायडे, अब्दुल करीम अब्दुल जलील, इनतीयाज अहेमद, वैकुंठ देशमुख आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
मोदी सरकारच्या अच्छे दिनाची प्रतिकात्मक श्रद्धांजली
अमरावती : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला २६ मे रोजी १ वर्ष पूर्ण झाले. परंतु या वर्षभरात भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मंगळवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने भाजपा सरकारच्या अच्छे दिनाची पहिली पुण्यतिथी व प्रतिकात्मक आंदोलन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली.
भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न दाखवून त्यांचा विश्र्वासघात केला व आपल्या पदरात मते पाडून घेतली. परंतु अच्छे दिनाचा नारा देणाऱ्या केंद्र शासनानेच सर्वसामान्य व शेतकऱ्यांना वाईट दिवस आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने घेतलेल्या शेतकरी, व जनतेच्या विरोधी धोरणाविरुद्ध काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे.
मागील २६ मे रोजी केंद्रात सत्तेवर बसलेल्या भाजपा सरकारने याच दिवशी जनतेचा विश्र्वासघात केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाभर अच्छे दिनाची पुण्यतिथी साजरी करून याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल स्वस्त करणार, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रोखणार, दरवर्षी २.५ कोटी नोकऱ्या देणार, विदेशातील काळा पैसा शंभर दिवसांत परत आणणार, अशा घोषणा केल्या होत्या. मात्र एक वर्ष होऊनही पंधरा पैसेसुध्दा परत आणले नसल्याचे सांगत बबलू देशमुख म्हणालेत. याशिवाय प्रत्येक भारतीयांच्या खात्यात १५ लाख जमा करणार, शेतीच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणार, किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करणार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अभूतपूर्व मदत करणार, दहशतवाद मोडून काढू, अशी विविध आश्वासने दिलीत. मात्र यापैकी एकाही घोषणेची मोदी सरकारने पूर्तता केली नसल्याने काँग्रेस पक्षाने जिल्हाभर निषेध आंदोलन केले.
पत्रपरिषदेला जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, प्रल्हाद ठाकरे, श्रीराम नेहर, विद्या देडू, उषा उताणे, प्रकाश काळबांडे, बापुराव गायकवाड, संजय मापले, अक्षय भुयार, बच्चू बोबडे, भागवत खांडे, बिटू मंगरोळे व पदाधिकारी उपस्थित होते.
नांदगावात सरकारविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांचे धरणे
नांदगाव खंडेश्वर : लोकसभा निवडणुकीत नागरिकांना दिलेली प्रमुख आश्वासने केंद्र सरकारने अद्यापही पूर्ण केली असल्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी 'अच्छे दिन'च्या पहिल्या पुण्यतिथीत नागरिकांचा वचनभंग करणारे मोदी सरकारचा प्रतिकात्मक निषेध असे बॅनर झळकत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीदरम्यान अनेक आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद चौधरी, लोकसभा युवक काँग्रेसचे महासचिव अक्षय पारसकर, शहराध्यक्ष अमोल धवसे, देवीदास सुने, इद्रिसभाई, दीपक सवाई, विजय चांदणे, सुधीर पाटेकर, संगीता सवाई, सविता सवाई, संजय पोफळे, प्रदीप ब्राम्हणवाडे आदी उपस्थित होते.