४५ लाख विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश
By Admin | Updated: May 23, 2014 23:32 IST2014-05-23T23:32:41+5:302014-05-23T23:32:41+5:30
सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या ४५ लाख ६६ हजार ५०७ गरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वितरीत करण्याचे आदेश राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.

४५ लाख विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश
सुरेश सवळे - चांदूरबाजार
सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या ४५ लाख ६६ हजार ५०७ गरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वितरीत करण्याचे आदेश राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. यासाठी १६३ कोटी ८६ लाख ५३ हजार रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. तर विदर्भाला गणवेशासाठी ४२ कोेटी ४३ लाख २७ हजार ४०० रुपये मिळणार आहे. या गणवेश वाटपाचे सर्वाधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आले असून समितीच्या माध्यमातून दरपत्रक मागविण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य शिक्षण (प्राथमिक) परिषदेने ११ एप्रीलला या संबंधातील आदेश जिल्हा शिक्षण विभागाला निर्गमित केले आहे. दोन वर्षापूर्वी यंत्रमाग महामंडळाकडून गणवेशाचे अधिकार काढून ते शाळा व्यवस्थापन समितींना दिले. गेल्या काही काळात विद्यार्थ्यांना चक्क दिवाळीपर्यंत गणवेश मिळाला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना गणवेशाशिवाय शाळेत जावे लागले होते. हा अनुभव लक्षात घेता शिक्षण विभागाने पूर्वतयारी म्हणून १४ फेब्रुवारी पासूनच गणवेशासाठी विद्यार्थ्यांचे मापे घेऊन तसा अहवाल शिक्षण विभागाला पाठविण्याच्या सूचना केला. प्रति विद्यार्थी दोन गणवेश मिळण्याची तरतूद असून यासाठी राज्य शासनाकडून ३६ लाख २६ हजार ७६० विद्यार्थ्यांसाठी चारशे रुपये तर केंद्राकडून ९ लाख ३९ हजार ७४७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोनशे रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नव्याने प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी महिन्याभराच्या आत जूलै पर्यंत पूर्ण गणवेश तयार झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गणवेश वाटपाला उशीर झाल्यास शाळा समिती, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकार्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. विदर्भाला गणवेशासाठी ४२ कोेटी ४३ लाख २७ हजार ४०० रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात अमरावती जिल्ह्यात ५ कोटी ८२ लाख १९ हजार रुपयांचा निधी आला आहे. लवकरच अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येणार आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्याची अभिनव योजना शासनाने आखली असून याचा लाभ हजारो विद्यार्थ्याना होत आहे. गणवेश वाटपाची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली आहे.या समिति मार्फतच चालू शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन प्रमाणे गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे.