पोलीस ठाण्यावर हल्ला करून पेटविली स्वातंत्र्याची मशाल !

By Admin | Updated: August 9, 2015 00:37 IST2015-08-09T00:37:02+5:302015-08-09T00:37:02+5:30

बेनोडा, इत्तमगाव, लोणी या भागातील जनतेने सरकारवर हात न उचलता अगदी गांधीगिरीने हसत-हसत मृत्युच्या दाढेत ...

Fire brigade of police station attacked! | पोलीस ठाण्यावर हल्ला करून पेटविली स्वातंत्र्याची मशाल !

पोलीस ठाण्यावर हल्ला करून पेटविली स्वातंत्र्याची मशाल !

वरुड : बेनोडा, इत्तमगाव, लोणी या भागातील जनतेने सरकारवर हात न उचलता अगदी गांधीगिरीने हसत-हसत मृत्युच्या दाढेत जाण्याचा जो पराक्रम केला तो आफ्रिकेत महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहाच्या तोडीचा किंबहुना त्याहूनही अधिक उदात्त असा होता, असे म्हणायला हवे.
धवलगिरीच्या लढ्याला संग्राम म्हणण्यापेक्षा तो खऱ्या सत्याग्रहच होता, हे म्हणणे अधिक संयुक्तीक ठरेल. या ठिकाणी कुण्या पोलिसावर ती तलवार चालविली नाही. महात्मा गांधीच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘क्रोधात येऊन विवेक गमाविलेल्या स्थितीत कुणाचे बळी घेण्यापेक्षा स्वत: मरण पत्करुन शत्रूचे हृदय परिवर्तन करणे हे अधिक उदात्त व श्रेष्ठ जीवनमूल्य होय’ या परीक्षेला धवलगिरीचा परिसर उतरला खरा उतरला.
१५ आॅगस्ट १९४७ हा दिवस देश स्वातंत्र्याचा पहिल्या सूर्योदयाने साजरा केला गेला. त्यावेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला. तिरंगा फडकविण्यासाठी देशवासीयांनी जो त्याग केला त्यापैकी बेनोडा (शहीद) चा रणसंग्राम काही औरच होता. आजही शहीदस्तंभ त्या दिवसाची आठवण येणाऱ्या पिढीकरिता प्रेरणादायी ठरत आहे.
९ आॅगस्ट क्रांतीदिन म्हणजे ९ आॅगस्ट १९४२ रोजी ‘इंग्रजांना भारत छोडो’चा इशारा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ‘करा या मरा’चा नारा दिला. या एका शब्दाने संपूर्ण भारत पेटून उठला. याचा परिणाम वरुड तालुक्यातील बेनोडा (शहीद) परिसरातील गावेसुध्दा मागे राहिली नाहीत. यामध्ये इत्तमगाव, लोणी, बेनोडा ही गावेसुध्दा अग्रेसर होती. केशवराव ताथोडे, श्रावण फरकाडे, महादेवराव क्षीरसागर, वामनराव पाटील, बाबूशेठ चांडक, पंजाबराव सदातपुरे, लालजी कानफाडे आणि त्यांचे बंधूंसह आदी देशभक्तांमध्ये क्रांतीची ज्वाला भडकली. ‘चले जाव’चा नारा वरुड परिसरात बुलंद करण्यात आला. या काळात जनजागृतीसाठी अनेक आंदोलने झालीत. प्रभातफेरी निघाली, पटवाऱ्यांची दफ्तरे ताब्यात घेण्यात आलीत. सरकारी कार्यालयावर तिरंगा फडकविण्यात आला. शेकडो देशभक्तांची धरपकड झाली. जाहीर सभा घेताना अनेकांना कारागृहात डांबण्यात आले.
१६ आॅगस्ट १९४२ रोजी सकाळी ८ वाजता इत्तमगावचे वीर वामनराव पाटील यांच्या नेतृत्वात बेनोडा येथे क्रांती दिंडी निघाली. या दिंडीत करजगाव, परसोडा, बेलोरा, सावंगा, इत्तमगाव, येथील शेकडो सत्याग्रही सहभागी झाले होते. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्त्वापासून या परिसरातील युवक राष्ट्रीय भावनेने प्रेरित होऊन स्वातंत्र्याच्या युध्दात सहभागी झाले होते. यादवराव खांडपासोळे, शेषराव मुधोळकर, बळीराम फरकाडे यांनी सत्याग्रहाची दिशा ठरविण्यासाठी गोपनीय सभा घेतली. यावेळी बेनोडा येथे कार्यरत सबइन्स्पेक्टर निंबाळकर यांनी त्यांना अटक केली. यामुळे संतापलेल्या युवकांनी आक्रमक पाऊल उचलले. सरकारी दफ्तर जाळण्याची स्वयंस्फूर्त घटना घडली. यामुळे पोलीस खाते सतर्क झाले. या घटनेपूर्वीच अटक झालेले केशवराव बारमासे व गणपतराव चिंचमलातपुरे ठाण्यात उपस्थित होते. पाचही युवकांना अमरावतीच्या तुरुंगात रवाना करण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तात नेत असतांना बेनोड्याच्या बसथांब्यावर जमलेल्या लोकांनी पाहिले असताना प्रचंड घोषणाबाजी करुन नेत्यांच्या सुटकेची मागणी केली. या आंदोलनाचे वृत्त सुशिक्षित व तडफदार क्रांतिवीर केशवराव ताथोडे यांना सांगण्याकरिता पुंडलिकराव गोहाड आणि अयुबभाई बेलोऱ्याला रवाना झाले. स्वातंत्र्य प्राप्तीकरिता युवकांनी पुढाकार घेऊन आॅगस्ट क्रांतीची ज्वाला पेटविली. यामुळे तत्कालीन डीएसपीने कुणाचाही मुलाहिजा न करण्याचा आदेश दिला. यामुळे पोलिसांनी दडपशाही करण्यास प्रारंभ केला. यावेळी शेषराव मुधोळकर, बळीराम फरकाडेंसह अनेकांना तुरूंगात डांबण्यात आले. १६ आॅगस्ट १९४२ रोजी नागपंचमीच्या दिवशी धवलगिरीच्या पावनकाठी धरतीमातेला बेनोड्याच्या सुपुत्रांनी रक्ताचा अभिषेक केला आणि क्रांतीची मशाला पेटविली. लोणी, करजगाव, पळसवाडा, इत्तमगाव, बेलोरा, सावंगा, बेनोडा आदी गावामध्ये महात्मा गांधींच्या ‘करा किंवा मरा’ या मंत्राने बलिदानाचे वारे वाहू लागले होते. या अनुषंगाने ठाणाठुणीच्या जंगलात केशवराव ताथोडे यांच्या नेतृत्वात कार्यक्रम ठरविण्याकरिता गोपनीय बैठक घेण्यात आली. यावेळी पकडले गेले किंवा मृत्यू झाल्यास उत्तरार्धाची जबाबदारी कोण सांभाळणार हा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे ताथोडे यांना भूमिगत ठेवून कार्य करण्याची सूचना देण्यात आली.
बेनोड्याची क्रांती गाथा
आज ९ आॅगस्ट. आॅगस्ट क्रांती दिन. १९४२ साली देशभरात या दिवशी क्रांतीची मशाल पेटली. त्यात अमरावती जिल्हादेखील मागे नव्हता. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर अनेक देशभक्तांच्या पावलांवर पाऊल टाकून स्वातंत्र्यलढ्यात लोक सहभागी होत होते. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्याकडूनही आहुती पडावी, अशी प्रत्येकाचीच धडपड होती. या लढ्यात वरूड तालुक्यातील बेनोडा या छोट्याशा गावाने दिलेले योगदान अविश्वसनीय असे आहे. संपूर्ण वरूड तालुक्यातील शेकडो देशभक्तांनी बलिदान दिले. तुरूंगवास भोगले, इंग्रजांच्या काठ्या झेलल्या. हजारो लोक भूमिगत झाले. कित्येकांचा तुरूंगातच मृत्यू झाला. त्यांच्या धाडसाच्या, देशभक्तीच्या आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाच्या सुरस कथा आजही मोठ्या अभिमानाने सांगितले जातात. अशा या देशभक्तांना ‘लोकमत’चा सलाम.
बेनोडा पोलीस ठाण्यावर तिरंगा लावण्याचा ध्यास
सबंध बेनोडा सर्कल पेटले असताना कोणत्याही घटकेला विपरीत घटना घडू नये म्हणून इंग्रज प्रशासनाने खबरदारीच्या उपायोजना म्हणून बेनोडा ठाणेदाराच्या मदतीला वरुडचे सर्कल इन्स्पेक्टर पाठविले होते. तर गावागावातून स्वातंत्र्य संग्राम सैनिक एकत्र झाले. ठरल्याप्रमाणे सत्याग्रहींचा मोर्चा निघाला. महात्मा गांधींचा जयजयकार करीत 'भारत माता की जय'चा नारा सर्वत्र गरजला. यावेळी वीर वामनराव पाटील यांनी ‘छातीवर गोळ्या झेलण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनीच फक्त आमच्याबरोबर यावे’ असे आवाहन केले. याचवेळी उपस्थितांनी जयघोष केला ‘ हम तुम्हारे साथ है ’असे म्हणून मिरवणूक पुढे सरकत होती. सर्वत्र गगणभेदी घोषणा गरजल्या. याचवेळी बेनोडा बस थांब्यावर जलालउद्दीन नावाचा कॉन्स्टेबल दिसताच काही उत्साही तरुणांनी सरकारी टोपी आणि पट्टा काढून घेतला. या सत्याग्रहामध्ये १६ आॅगस्टच्या क्रांती लढ्यात पोलिसांनी बेधूंद गोळीबार केला. यामध्ये तिधांना वरीमरण आले. यामध्ये विनायक यावले, महादेव बारमासे आणि पांडुरंग मालपे यांचा समावेश होता. असे असतानादेखील स्वातंत्र्यवीरांचे मनोधैर्य खचले नाही. उलट संतापाने पेटनू उठलेले पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी महादेव पावडे यांच्या पोटात गोळी घातली. त्यांना सावरण्याकरिता वीर वामनराव पाटील पुढे सरसावले. त्यांना दुसरी गोळी लागली. दोघेही जमिनीवर कोसळले, शेकडो वीर जवान जखमी झाले. तरीसुध्दा पोलीस ठाण्यावर झेंडा फडकला. या स्वातंत्र्य संग्रामाची आठवण म्हणून बेनोडा येथील शहिदांच्या पावनभूमीत १३ फूट उंचीचा शहीदस्तंभ उभारण्यात येऊन याचे १६ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य संग्राम सेनानी ब्रिजलाल बियाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या पावनभूमीला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शहीद भगतसिंगाचे भाऊ कुलविरसिंगांसह आदींचे चरणस्पर्श लाभले आहे. अशा पध्दतीने अविस्मरणीय असा बेनोड्याचा स्वातंत्र्य संग्राम आहे.

Web Title: Fire brigade of police station attacked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.