अखेर वाढला चौपदरीकरणाचा वेग
By Admin | Updated: May 26, 2015 00:14 IST2015-05-26T00:14:01+5:302015-05-26T00:14:01+5:30
परतवाडा शहरातील रस्ता चौपदरीकरणाच्या कामात कंत्राटदारांनी रस्त्यावर टाकून ठेवलेले गिट्टीचे ढिगारे पसरविले आहे.

अखेर वाढला चौपदरीकरणाचा वेग
गिट्टी पसरविल्याने मार्ग खुला : अतिक्रमण मोहिमेचे घोडे मात्र अडलेलेच
नरेंद्र जावरे अचलपूर
परतवाडा शहरातील रस्ता चौपदरीकरणाच्या कामात कंत्राटदारांनी रस्त्यावर टाकून ठेवलेले गिट्टीचे ढिगारे पसरविले आहे. कामाची गती वाढविल्याची स्थिती आहे. मात्र शहरातील अतिक्रमण मोहिमेचे घोडे अडल्याने वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत रस्ता व चौपदीकरणाचे कार्य मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. संथगतीने सुरु असलेल्या या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे असलेले दुर्लक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतणारे ठरत असल्याचे चित्र आहे. रस्ता चौपदरीकरणात एकेरी रस्त्यावरुन दुहेरी वाहतूक करताना संबंधित कंत्राटदाराने गिट्टीचे ढिगारे टाकले होते. परिणामी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागानेसुध्दा यावर कुठलाच आक्षेप घेतला नव्हता.
रविवारी 'लोकमत'ने रस्ता चौपदरीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी वळण रस्ता दाखविणारे फलक व वाहतूक एकेरी रस्त्यावरुन बंद करीत थेट ‘ट्रकच’ रस्त्यावर आडवा लावला होता. तर ज्या एकेरी रस्त्यावरुन दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली तो रस्ता सुरळीत केला. मात्र त्यावरील बारीक गिट्टी न काढल्याने दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांना पायी चालणे कठीण झाले आहे. गिट्टीचे ढिगारे पसरविण्याच्या कार्याने गती घेतल्याचे दिसून येत होते.
वाहतुकीचा
अडथळा कायमच
जयस्तंभ चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत सुरू असलेल्या रस्ता चौपदीरकरणाच्या कामात वाहतुकीचा अडथळा मात्र परतवाडा शहराला लागलेल्या ‘शापा’ प्रमाणेच आहे. चौपदरीकरणाच्या रस्त्यावरुन एकेरी रस्त्यावर दुहेरी वाहतूक सोमवारीही सुरु होती. परतवाडा शहरातील प्रमुख मार्ग असल्याने मध्य प्रदेशात जाणारा आंतरराज्यीय मार्गसुध्दा आहे. या रस्त्यावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तरी खासगी बसगाड्या व ट्रक रस्त्याच्या कडेने उभे करण्यात आले. गिट्टीच्या ढिगाऱ्यांसह खासगी बसगाड्यांची रस्त्यावर ‘दादागिरी’ वाहतुकीसाठी मोठी अडचण ठरली आहे.
जबाबदारी कुणाची?
परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरातील दीड लाखांवर लोकसंख्या असून कांडली, देवमाळी, मल्हारा, गौलखेडा, धामणगाव, धोतरखेडा, एकलासपूर, नारामणपूर यमक, खांजणकर, खरपी, कोठारा, सालद, कविठा या ग्रामपंचायती शहराला अगदी लागून आहेत. परिणामी मेळघाट, भैसदेही, बैतुल, अंजनगाव, चांदूरबाजार या तालुक्यातील ठिकाणी ४० गावांतील नागरिकांसाठी मोठी बाजारपेठ परतवाडा येथे आहे. परंतु येथील चोरीला गेलेले रस्ते पाहता सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. खासगी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या व ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालवाहू ट्रक रस्त्यावरून हटवायचे कुणी? ती जबाबदारी कुणाची, नगरपालिकेने त्यावेळी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था का करु नये, आदी सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे प्रशासकीय यंत्राणा व लोकप्रतिनिधी देणार का? जबाबदारी कुणाची ? हाच प्रश्न एकमेकांकडे निर्देश करीत असल्याने उपस्थित झाला आहे.