१० लाख पशुधनाला वैरण, पाणीटंचाईची झळ
By Admin | Updated: March 8, 2015 00:06 IST2015-03-08T00:06:54+5:302015-03-08T00:06:54+5:30
जनावरांसाठी दरदिवशी १५ किलो वाळलेला व ५ किलो हिरवा चारा आवश्यक आहे. जिल्ह्याचे पशुधन १० लाख असल्याने २० लाख मेट्रिक टन चारा एका हंगामात लागणार आहे.

१० लाख पशुधनाला वैरण, पाणीटंचाईची झळ
गजानन मोहोड अमरावती
जनावरांसाठी दरदिवशी १५ किलो वाळलेला व ५ किलो हिरवा चारा आवश्यक आहे. जिल्ह्याचे पशुधन १० लाख असल्याने २० लाख मेट्रिक टन चारा एका हंगामात लागणार आहे. यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत, अशी वैरण साठवण होण्याची सुतराम शक्यता नाही. वैरण पाणीटंचाईची झळ जाणवू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीला काढली आहेत.
पावसाअभावी खरीप २०१५ चा हंगाम उद्ध्वस्त झाला. जिल्हा टंचाईग्रस्त घोषित करण्यात आला. अपुऱ्या व खंडित पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे पडू लागले. प्रकल्पातील पाणी पिण्यास गुरांना मनाई आहे. वैरणाची भीषण टंचाई आहे. प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन न देणारी जनावरे शेतकऱ्यांना कत्तलखान्याकडे मार्गस्थ करण्याचा निरुपाय झाला आहे.
खरीप २०१५च्या हंगामात पेरणीपासून पावसाने दडी मारली. पावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. परिणामी आज जनावरांना वैरण उपलब्ध नाही. पाऊस कमी, जमिनीत पाण्याची कमतरता. यामुळे नदी-नाले कोरडे पडले. पाणी प्रवाहित नसल्यामुळे तुंबलेल्या पाण्यात 'जलपर्णी' वाढून गटारे निर्माण झालीत. हे पाणी जनावरांना पिण्यास अयोग्य आहे. पशुधन पाळणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांनी ते विक्रीला काढली आहे. त्यामुळे जनावरे बेभाव खरेदी करणे सुरू केले आहे. १९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात पाच वर्षांच्या तुलनेत बैलांची संख्या १४ हजार २५ इतकी कमी झाली. यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ६.३ टक्के आहे. वैरणटंचाई, वाढती मजुरी, वर्षाकाठी लाखावर पोहचलेला घरगड्याचा महिना, हीदेखील त्यामागील कारणे आहेत. दुधाळू जनावारांच्या संख्येत मात्र दखलनीय वाढ झाली आहे.