संविधान दहन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:23 IST2018-08-11T21:23:38+5:302018-08-11T21:23:59+5:30

संविधान दहन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशाच्या राजधानीत ९ आॅगस्टला भारताच्या संविधानाचे दहन करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी, संभाजी बिग्रेडद्वारा शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिल्ली येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाचे दहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोणातून हे कृत्य घातक आहे. त्यामुळे या समाजकंटकांवर देशद्रोहाची कारवाई करून देशातील जनतेचा रोष शांत करावा, असे निवेदनात नमूद आहे. यावेळी संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष रणजित तिडके, महानगर अध्यक्ष संजय ठाकरे, शरद काळे, सुयोग वाघमारे, हर्षवर्धन भारती, शुभम शेरेकर, अजय लेंडे, मनोज लोखंडे आदी उपस्थित होते.
श्रमिकराज संघटनेचे नांदगाव ठाणेदारांना निवेदन
दिल्ली येथे काही समाजकंटकांनी देशाच्या संविधानाची प्रत जाळली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह घोषणा दिल्यात. त्याचा फोटो, व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केला. या समाजकंटकांवर देशद्रोहाचा व आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमिकराज जनरल कामगार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राहुल उके यांनी शनिवारी नांदगाव पेठ ठाणेदारांना निवेदनाद्वारे केली. यावेळी संजय आठवले, सुमेध कांबळे, आदर्श डोंगरे, मुकेश तायडे, नितीन डोंगरे, सुरेंद्र तंतरपाळे आदी उपस्थित होते.