गणपतीच्या निर्माल्यापासून बनणार खत
By Admin | Updated: September 22, 2015 00:23 IST2015-09-22T00:23:07+5:302015-09-22T00:23:07+5:30
सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. हजारोंच्या संख्येने गणपतींची स्थापना करण्यात आली आहे.

गणपतीच्या निर्माल्यापासून बनणार खत
पुढाकार : आदर्श शिक्षिका रजनी आमले यांचा पुढाकार, विसर्जनस्थळी गोळा केले जाते निर्माल्य
लोकमत शुभवर्तमान
अमरावती : सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. हजारोंच्या संख्येने गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. दररोज या गणपतींना हार, फुले, दुर्वा नेमाने वाहण्यात येतात. मात्र, गणपतीला श्रद्धापूर्वक वाहिले गेलेला दुर्वा आणि फुलांचे पुढे निर्माल्य होते. तसेच यामुळे प्रदूषणात भर पडते. ही बाब हेरून एका शिक्षिकेने निर्माल्यापासून खत बनविण्याची शक्कल लढविली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी नदीकाठी उभे राहून त्या निर्माल्य संकलन करतात.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदर्श पुरस्काराने पुरस्कृत सहायक शिक्षिका रजनी आमले या मागील सात ते आठ वर्षांपासून निर्माल्यापासून खत बनविणऱ्या प्रकल्पावर काम करीत आहेत. रजनी आमले यांनी सांगितले की, त्या गेल्या अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गणेशाच्या मूर्तीवरून निघालेले निर्माल्य एकत्रित करतात. त्यापासून त्या खत तयार करतात. गणेशोत्सव मंडळांजवळ त्या निर्माल्य संकलनासाठी एक पोते ठेवतात. त्यात निर्माल्यासह मूर्तीवर वाहिली जाणारी सामग्री संकलित करतात. सण इको फ्रेंडली पद्धतीने साजरे करण्यावर रजनी आमले यांचा भर आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश जावा, या उद्देशाने रजनी आमले हा उपक्रम राबवीत आहेत. (प्रतिनिधी)
खत तयार करण्याची प्रक्रिया
रजनी आमले या अनेक वर्षांपासून घरगुती गणपती तसेच गणेशोत्सव मंडळ आणि नदीच्या काठावर उभे राहून निर्माल्य संकलित करतात. त्यानंतर त्यातून फूल, बेल आणि हार वेगळे करतात. त्यानंतर हे निर्माल्य शाळेच्या बगिच्यात खोल खड्डा करून पुरले जातात. दोन दिवस यात शेण टाकून ते कुजविले जाते. त्यानंतर मातीने ते झाकून ठेवण्यात येते. वर्षभरानंतर हे खत काढून पुन्हा हीच प्रक्रिया केली जाते.
शाळेमध्येच वापर
रजनी आमले यांनी सांगितले की, वर्षभरात हे खत तयार होत असले तरी मध्ये हे खत काढून त्याचा उपयोग शाळेच्या बगिचासाठी केला जातो. यातून विद्यार्थ्यांना ज्ञान तर मिळतेच. पण, त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयक जागरूकताही निर्माण होते.
भारतीय चलनाचा अपव्यय
अनेक गणेशोत्स्व मंडळांद्वारे विड्याखाली ठेवले जाणारे पैसेदेखील नदीमध्ये विसर्जित केले जातात. यामुळे भारतीय चलनाचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी रजनी आमले यांनी गणेशोत्सव मंडळांना विड्याखाली ठेवलेली सुपारी आणि पैसे निर्माल्यासमवेत टाकण्याचे आवाहन रजनी आमले यांनी केले आहे.