पर्यटन क्षेत्र व्याघ्र परिक्षेत्रात नेण्याचा घाट
By Admin | Updated: February 26, 2017 00:15 IST2017-02-26T00:15:43+5:302017-02-26T00:15:43+5:30
विदर्भाचे एकमेव नंदनवन संपविण्याचा घाट रचला जात असून येथील संपूर्ण परिसर अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या व्याघ्र परिक्षेत्रात नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पर्यटन क्षेत्र व्याघ्र परिक्षेत्रात नेण्याचा घाट
उपस्थितांमध्ये खळबळ : पर्यटन महोत्सवात नगराध्यक्षांचा आरोप
चिखलदरा : विदर्भाचे एकमेव नंदनवन संपविण्याचा घाट रचला जात असून येथील संपूर्ण परिसर अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या व्याघ्र परिक्षेत्रात नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परिणामी या सर्व गोपनीय असल्या तरी यातून चिखलदरा पर्यटन नामशेष होण्याचा आरोप नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी चिखलदरा पर्यटन महोत्सवात केला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
विदर्भाचे पर्यटन स्थळ पूर्वीपासूनच विकासापासून वंचित आहे. अशात या परिसराला पूर्ण व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात नेण्याचा डाव नॅशनल व्याघ्र प्राधिकरणाने रचला आहे. अत्यंत गोपनियतेने याचे कार्य केले जात असून संरक्षित असलेले वनविभागाचे क्षेत्र अतिसंरक्षित करून पूर्णत: विकास थांबविला जाणार असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी म्हटले आहे.
व्याघ्र प्रकल्प की सिडको संभ्रम कायम
चिखलदरा परिसरातील मोथा, लवादा, मडकी, आलाडोह, शहापूर हा परिसर सिडको अंतर्गत विकासासाठी घेण्यात आला. मात्र आता हाच परिसर वन विभागातून थेट व्याघ्र प्रकल्पात नेल्या जात आहे. व्याघ्र प्रकल्पाचे नियम अत्यंत कडक असल्याने या परिसरात पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा व इतर प्रकल्प करणे शक्य नाही.
सिडको की व्याघ्र प्रकल्प अशा द्विधा मन:स्थितीत हे पर्यटन स्थळ सापडल्याचा आरोप नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
सिडकोचे गाजर, विकास शून्य
चिखलदरा पर्यटन स्थळाचा विकास सर्वांगिण व्हावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बंद झालेला पर्यटन महोत्सव पुन्हा सुरू केला. येथे आ. सुनील देशमुख यांनी आणलेल्या सिडको प्राधिकरणाला गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी जाहीर केला. मात्र सिडकोतर्फे केवळ वेळ मारुन नेल्या जात आहे, तर प्रत्यक्षात आठ वर्षांत कुठल्याच कामाला सुरुवात झाली नाही, हे विशेष. परिणामी सिडकोमुळे एकप्रकारे विकास थांबल्याचे आता जाणवू लागल्याने पर्यटकांची संख्या रोडावू लागली आहे.
चिखलदरा व परिसराला व्याघ्र प्रकल्पात नेण्याचा सध्या कुठल्याच प्रकारचा प्रस्ताव नाही. अजूनपर्यंत तसे निर्देश प्राप्त झाले नाहीत.
- संजीव गौड, मुख्य वनसंरक्षक, अमरावती प्रादेशिक