फेब्रुवारीत कोरोनाचे १३ हजार ३९० रुग्ण, ९४ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:24 IST2021-03-04T04:24:02+5:302021-03-04T04:24:02+5:30
अमरावती : फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात १३ हजार ३९० जणांना कोरोनाची लागण झाली, तर ९४ जणांचा कोरोनाने बळी घेतल्याची नोंद ...

फेब्रुवारीत कोरोनाचे १३ हजार ३९० रुग्ण, ९४ जणांचा मृत्यू
अमरावती : फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात १३ हजार ३९० जणांना कोरोनाची लागण झाली, तर ९४ जणांचा कोरोनाने बळी घेतल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली. फेब्रुवारीत कोरोना संक्रमितांची वाढलेली आकडेवारी बघता याच महिन्यात समूह संसर्गाचा धोका होता, हे स्पष्ट होते.
गत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाबाधित आणि मृत्यूसंख्या कमी होती. मात्र, ८ ते १४ फेब्रुवारी या दरम्यान बाधितांची संख्या वाढत गेली. पुढे १५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान संक्रमित रुग्ण आणि कोरोनाने बळी घेणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत गेल्याची आकडीवारी आहे. कोरोना बाधितांचा वेग वाढत असल्याने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निर्णयानुसार २२ फेब्रुवारीपासून अमरावती महापालिका व अचलपूर नगरपालिका हद्दीत ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले. मात्र, या आठ दिवसांत ५,५९३ बाधित, तर ४८ रुग्णांना कोरोनाने जीव गमवावा लागला. परिणामी जिल्हा प्रशासनाने पुन्हा १ मार्चपासून नव्याने लॉकडाऊन घोषित केले. मात्र, मार्च महिन्यात तीन दिवसांत फेब्रुवारीच्या तुलनेत कोरोना संक्रमित आणि मृत्यू संख्या काही प्रमाणात ओसरत चालली आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊनचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेतील गर्दी कमी होत नसल्याचे वास्तव आहे. वाहनांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून, कोराेना नियमावलींचे पालन होत नसल्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा ठपका जिल्हा प्रशासनाने ठेवला. त्रिसूत्रीचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला लॉकडाऊनमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
------------------
फेब्रुवारीत बाधित अन् मृत्यूसंख्या
१ ते ७ फेब्रुवारी : १४७८ रूग्ण, ६ मृत्यू
८ ते १४ फेब्रुवारी : २२३७ रुग्ण, १२ मृत्यू
१५ ते २१ फेब्रुवारी : ४०६३ रूग्ण, २८ मृत्यू
२२ ते २८ फेब्रुवारी : ५५९३ रुग्ण, ४८ मृत्यू