शेतातील वृक्षांची राजरोसपणे कत्तल !
By Admin | Updated: June 15, 2015 00:19 IST2015-06-15T00:19:05+5:302015-06-15T00:19:05+5:30
शासन विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च करते.

शेतातील वृक्षांची राजरोसपणे कत्तल !
प्रशासनाचे दुर्लक्ष : 'झाडे लावा, झाडे जगवा'चा फज्जा
दर्यापूर : शासन विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिसरात हिरव्याकंच वृक्षांची बेधडक मशीनद्वारे कत्तल सुरू आहे. यामुळे हा परिसर उघडा बोडखा दिसू लागला आहे. तालुक्यात कधीकाळी वृक्षांची मोठ्या प्रमाणात होती. परंतु या ना त्या कारणांमुळे सतत सुरू असलेल्या वृक्षकटाईमुळे आज वृक्षांशी निसर्गाचे असमतोल जाणवत आहे. त्यामुळे पाऊससुद्धा वेळेवर पडत नाही व कमी पडतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा ते सात महिन्यांपासून तालुक्यातील रानवैऱ्यांनी हिरव्या वृक्षांवर कुठाराघात सुरू केला आहे. दर्यापूर ते अकोट मार्गावर खुलेआम मशीनद्वारे झाडांची कत्तल होत आहे. या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट देऊन कार्यवाही केली नाही. झाडे तोडण्यासाठी अतिशय कमीवेळ लागावा म्हणून मशीनद्वारे झाडे तोडण्यात येत आहेत. गल्लेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी कळसूत्री कार्यरत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कडूनिंब, बाभळी आदी झाडांची कत्तल सुरू आहे. वृक्षमाफियांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सतत आर्थिक देवाणघेवाण सुरू असल्यामुळे वृक्षमाफिया कोणालाही न घाबरता वृक्षांची अवैध कत्तल करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
वृक्षांची सर्रास कटाई
सध्या इंधनाचे दर प्रचंड वाढले आहे. इमारतीसाठी लाकूड वापरण्यात येत नसले तरी निंब, बाभूळ व आम्रवृक्षांची लाकडे इतर अनेक कामांसाठी उपयुक्त ठरत असल्याने दरही चांगला मिळतो. शेतकरी व्यापाऱ्यांना हाताशी धरुन त्यांच्या शेतातील झाडे कमी किमतीत व्यापाऱ्यांना देतात. संबंधित अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने परवानगीचीही भानगड नसते.