दरदिवशी शेतकरी आत्महत्या

By Admin | Updated: October 1, 2015 00:34 IST2015-10-01T00:34:20+5:302015-10-01T00:34:20+5:30

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेली दडी, त्यामुळे उद्ध्वस्त झालेले सोयाबीन यामुळे प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी वैतागून मृत्यूला कवटाळत आहे.

Farmers' suicide every day | दरदिवशी शेतकरी आत्महत्या

दरदिवशी शेतकरी आत्महत्या

कधी संपणार दुष्टचक्र ? : तीन महिन्यांत ९२ आत्महत्या
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेली दडी, त्यामुळे उद्ध्वस्त झालेले सोयाबीन यामुळे प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी वैतागून मृत्यूला कवटाळत आहे. यंदा जून ते सप्टेंबर या ९१ दिवसांत ९२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा पाश आवळला. शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सुरू असलेले शासनाचे प्रयत्न मुळात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
राज्यात १४ जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये अमरावती जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यंदाच्या जुलै महिन्यात ३६, आॅगस्टमध्ये ४१ व सप्टेंबर महिन्यात १६ अशाप्रकारे ९१ दिवसांत ९२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे. मागील वर्षी २०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. यंदा मात्र आॅगस्ट महिन्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा पार झाला आहे. सप्टेंबर अखेर २१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यापैकी १४५ प्रकरणे निकषात पात्र ठरली तर ४२ अपात्र ठरली असून २९ प्रकरणे प्रलंबित आहेत.
यंदा आॅगस्टअखेर कोरडवाहू क्षेत्रात पीक न झाल्यामुळे ७० शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यापैकी ६० प्रकरणे पात्र ठरली. कालव्याअभावी ५, बोअरअभावी ६, सिंचनासाठी विहीरी नसल्याने ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३० प्रकरणे निकषांमध्ये पात्र ठरलीत. कौटुंबिक कलहामुळे ६, खासगी कर्जामुळे २, आजारपणामुळे ७ व ईतर कारणांमुळे ११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)

अत्यल्प भूधारकांच्या सर्वाधिक आत्महत्या
जानेवारी ते आॅगस्टअखेर २०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यापैकी ७० आत्महत्या या अडीच एकराच्या आतील शेतकऱ्यांच्या म्हणजे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. अल्पभूधारक (५ एकर) ३२ व बहुभूधारक ४२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे.

आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक आत्महत्या
जिल्ह्यात जानेवारी २००१ ते सप्टेंबर २०१५ दरम्यान सर्वाधिक २६१ शेतकरी आत्महत्या आॅगस्ट महिन्यात झाल्या आहेत. यंदादेखील सर्वाधिक ४१ आत्महत्या आॅगस्ट महिन्यातच झाल्या आहेत.

अल्पभूधारक व युवा शेतकऱ्यांना तणावातून ‘रिलॅक्स’ करण्यासाठी उपाययोजना सुरू करणार आहोत. यासाठी गाव समिती स्थापन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आरोग्य व रेशन आदी सुविधा दिल्या जात आहेत.
- किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी स्वालंबन मिशन.

Web Title: Farmers' suicide every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.