नाफेड केंद्रावर शेतकरी ताटकळत
By Admin | Updated: April 9, 2017 00:10 IST2017-04-09T00:10:24+5:302017-04-09T00:10:24+5:30
नाफेडद्वारे ४ जानेवारीपासून सुरू झालेली तूर खरेदीची प्रक्रिया तीन महिने चालणार असल्याचे चित्र अचलपूर बाजार समितीत निर्माण झाले आहे.

नाफेड केंद्रावर शेतकरी ताटकळत
बारदाना नसल्याचे कारण : दिवसाला ७०० क्विंटल मोजणी
परतवाडा : नाफेडद्वारे ४ जानेवारीपासून सुरू झालेली तूर खरेदीची प्रक्रिया तीन महिने चालणार असल्याचे चित्र अचलपूर बाजार समितीत निर्माण झाले आहे. बारदाना नसल्याचे कारण सांगून नाफेडचे अधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत आहे. दिवसाला केवळ ७०० क्विंटल तूर मोजमाप करीत आहेत.
बाजार समितीच्या यार्डमध्ये जानेवारीपासून सुरू असलेल्या नाफेड केंद्रावरील तूर खरेदीला तीन महिने झाले आहे. ३८५०० क्विंटल तुरीची मोजणी झाली. अद्याप १८ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्याची तूर बाजार समितीमध्ये उघड्यावर पडली आहे. तीव्र उन्हामुळे तुरीचे पोते फुटू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नाफेडकडून तीन काट्यांवर एकाच दिवशी सातशे क्विंटलची मोजणी होत आहे. बाजार समितीजवळ ३०० हमाल, ४५ मापारी व ७५ काटे असताना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचे वेळकाढू धोरण संताप आणणारे ठरत आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे बेजबाबदार वक्तव्य
या संपूर्ण माहितीबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी अशोक देशमुख यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. केवळ आपले ऐकून घ्या, बारदाना आहे. दररोज एक हजार क्विंटलची खरेदी केली जात असल्याचे बेजबाबदार उत्तर दिले, तर दुसरीकडे एक हजार क्विंटलच्या आत मोजणी झाल्याचा दावा संचालक पोपट घोडेराव, उपसभापती कुलदीप काळपांडे यांनी केला आहे.
बारदाना संपला
तूर खरेदीच्या सुरुवातीपासूनच अचलपूर केंद्रावर अल्प प्रमाणात बारदाना (गोणी) दिल्या जात आहे. परिणामी मोजणी बंद झाली. दुसरीकडे बाजार समितीजवळ मोठ्या प्रमाणात यंत्रणा असताना शेतकऱ्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रकार उघड झाला आहे. संथगतीने सुरू असलेली तूर मोजणी जुलै महिना उजाडणार काय, असा सवाल आता शेतकरी करू लागले आहे.