पिंप्रीच्या शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविले ‘रोटावेटर
By Admin | Updated: October 14, 2015 00:17 IST2015-10-14T00:17:07+5:302015-10-14T00:17:07+5:30
यावर्षी शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन सोने गहाण ठेवून तर काहींनी उसनवारी पैसे काढून शेतात सोयाबीन, तूर, कपाशी, मुगाची पेरणी केली.

पिंप्रीच्या शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविले ‘रोटावेटर
सोयाबीन एकरी एक ते दोन पोते : सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष
नंदकिशोर इंगळे पापळ
यावर्षी शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन सोने गहाण ठेवून तर काहींनी उसनवारी पैसे काढून शेतात सोयाबीन, तूर, कपाशी, मुगाची पेरणी केली. सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने पिकेसुद्धा जोमाने डोलू लागली. परंतु ऐन सोयाबीन फुले-कळ्यावर असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे परिसरातील पिंप्री निपाणी, हिवरा, वडाळा, कोव्हळा, सुकळी (गुरव), काजना, राजना, पिंप्री गावंडा, खेड आदी गावांतील शेतकऱ्यांची पीक स्थिती अतिशय गंभीर आहे.
काही सोयाबीन पिकांना तर अजिबातच शेंगा आल्या नाहीत. त्यातच सोयाबीन पिकावर यलो मॅझिकसारख्या रोगाने आक्रमण केल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नसल्याने या पिकावर शेतकऱ्यांना अखेर रोटावेटर फिरण्याची पाळी आली आहे. पिंप्री निपाणी येथील शेतकरी हेमंत प्रकाशचंद बोथरा या शेतकऱ्यांकडे ४० एक्कर शेतात २ लाख रुपये खर्च करून तूर, सोयाबीन पिकाची लागवड केली. मात्र सोयाबीन पिकाला शेंगाच नसल्याने अखेर या शेतकऱ्याने शेतात गुरे-ढोरे घातले आणि शेतात रोटावेटर फिरवारे लागले. शेतकऱ्यांना चक्क एकरी कोणाला एक तर कोणाला दोन-तीन पोत्यांचा उत्पादन होत आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन सवंगणी व काढणे याचा धड खर्च निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सोयाबीन पेरणीपासून पाहिजे त्यावेळी न पडलेल्या पावसामुळे वातावरणातील बदलामुळे तर उभ्या झालेल्या सोयाबीन पिकावर आलेल्या विविध संकटांमुळे पिकावर केलेला खर्च व्यर्थ गेल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. ज्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या यादीत मोडणाऱ्या नांदगाव (खंडेश्वर) तालुक्याच्या आणेवारीवर मात्र शेतकऱ्यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची दसरा-दिवाळी अंधारात जाणार, हे वास्तव समोर आहे. सोयाबीन पिकाची मशागत व त्यासाठी लागणारा खर्च जास्त व येणारी आवक अत्यंत कमी यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोायाबीन काढलेच नाही. परंतु डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा कमी होईल, या विचारात शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची कृषी विभाग व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागाचे सर्वेक्षण करून सुधारित आणेवारी घोषित करावी व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
पिंप्री निपाणी येथील शेतकऱ्याने शेतात जनावरे व रोटावेटर फिरवले
सोयाबीन पिकाची गंभीर स्थिती पाहून पिंप्री निपाणी येथील शेतकरी हेमंत प्रकाश बोथरा याने शेतात जनावरे घालून शेत चारून रोटावेटर फिरविले. यावेळी पिंप्री निपाणीचे सरपंच विशाल रिठे, रामेश्वर जुंजारे, राजू धार्मिक, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनोद राऊत, गोवर्धन ठाकरे, रवींद्र रिठे, नरेंद्र वानखडे, कांतेश्वर मुरादे, रमाकांत मुरादे, गोरख नगराळे, शाम कडू, अनिल रिठे, शरद गावंडे, सचिन रिठे, ज्ञानेश्वर रिठे, राजू साबळे, नारायण मेश्राम, मुकेश रिठे, जगन्नाथ अतकरी, रामहरी अतकरी अन्य शेतकरी उपस्थित होते.