शेतकऱ्यांचे पशुधन इतिहासजमा
By Admin | Updated: April 2, 2016 00:14 IST2016-04-02T00:14:30+5:302016-04-02T00:14:30+5:30
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसोबत पशुपालन व्यवसायही येथे चालतो. मात्र, ३-४ वर्षांपासून सततची नापिकी व दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे.

शेतकऱ्यांचे पशुधन इतिहासजमा
सततच्या दुष्काळाने चाऱ्याचीही कमतरता : शेतीसाठी धोक्याची घंटा
सुनील देशपांडे अचलपूर
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसोबत पशुपालन व्यवसायही येथे चालतो. मात्र, ३-४ वर्षांपासून सततची नापिकी व दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. त्याचा परिणाम पशुपालन व्यवसायावर होत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. जनावरांच्या वैरणाचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकरी पशुधन कवडीमोल भावात विकत आहेत.
पर्जन्यमान अनिश्चित आहे. पाऊस वेळी-अवेळी बरसत असल्याने शेतीपिकांची नासाडी होत आहे. अगोदरच नापिकी असताना अवकाळी पाऊस उरले सुरले पिकही वाहून नेतो. दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नसल्याने मागील १२ वर्षात १०० पेक्षा अधिक आत्महत्या शेतकऱ्यांनी तालुक्यात केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पशुपालन करावे, असा सल्ला राजकीय पुढारी देत असले तरी या जोडधंद्यासाठी लागणारा चाराही शेतकऱ्यांच्या शेतात उगवत नाही, याची माहिती स्वत:ला शेतकऱ्याची पोर म्हणविणाऱ्या पुढाऱ्यांनाही नाही.
अजूनही निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी शेतीच्या मशागतीकरिता बैलांचा वापर करतात. बैलांना शेतकऱ्यांचा सखा म्हणून संबोधले जाते. दोघांच्या मेहेनतीने अन्नाची निर्मिती होते. पण, आज पोशिंद्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. गाय हिंदू धर्मात गोमाता म्हणून ओळखली जाते.
तिच्यावर लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गोधन शेतकऱ्यांच्या घरी असणे म्हणजे श्रद्धा आणि सधनतेचे लक्षण समजले जाते. मात्र विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता शेतीपयोगी येणारे वखर नांगर, डवरा इत्यादी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.
परिणामी मागील आठ-दहा वर्षापासून बैलाची दावण दिसणे देखील कठीण झाले आहे. अचलपूर तालुक्यात परतवाडा येथे दर गुरूवारी जनावरे विक्रीसाठी येत असतात. त्यात बैलांची संख्या अधिक असते आणि खरेदीदार कमी असतात. या बैलांची कवडीमोल भावात विक्री होते. विक्री केलेले बैल शेतीच्या उपयोगासाठी नेले जातात की अवैध कत्तलखान्याकडे नेले जातात, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेली बैल आणि गार्इंची संख्या पर्यावरण विकासाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, असे जातीवंत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पशुपालकांना दिलासा देण्याची गरज आहे.