पीक विमाही महागल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By Admin | Updated: June 23, 2015 00:46 IST2015-06-23T00:46:42+5:302015-06-23T00:46:42+5:30

नैसर्गिक आपत्ती आणि वाढत्या महागाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Farmers in financial crisis due to crop insurance costlier | पीक विमाही महागल्याने शेतकरी आर्थिक संकटात

पीक विमाही महागल्याने शेतकरी आर्थिक संकटात

अतिरिक्त भुर्दंड : कपाशीच्या हप्त्यात तिप्पट वाढ
अमरावती : नैसर्गिक आपत्ती आणि वाढत्या महागाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत पीक विम्यासाठी भराव्या लागणाऱ्या प्रतीहेक्टर हप्त्याच्या रकमेतही विमा कंपनीने वाढ केली आहे. कपाशीसाठी सर्वसाधारण विमा हप्त्याचा दर ६.९० टक्क्यांवरुन २१ टक्क्यांपर्यंत म्हणजेच तीनपटीने वाढला आहे. खते, बियाणे व कीटकनाशकांच्या दरवाढीनंतर आता शेतकऱ्यांना पीकविमा हप्त्याच्या दरातही भाववाढीची झळ सोसावी लागणार आहे.
कपाशीचा सर्वसाधारण विमा संरक्षणासाठी प्रतीहेक्टर ६.९० टक्के दराने जवळपास १४०० रुपये हप्ता भरावा लागत होता. मात्र आता यामध्ये तीनपट वाढ झाल्याने म्हणजेच २१ टक्के दराने विमा रक्कम भरावी लागणार आहे. कपाशीसाठी बहुभूधारक शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर सर्वसाधरण हप्ता ४ हजार ७८८ रुपये तर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ४ हजार ३०९ रुपये हप्ता भरावा लागणार आहे. १५० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त विमा संरक्षण हवे असल्यास बहुधारक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ७ हजार १८२ रुपये तर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ६ हजार ४६४ रुपये विमा भरावा लागणार आहे. याशिवाय सोयाबीनच्या अतिरिक्त संरक्षणासाठी प्रतिहेक्टर १९ टक्के दरावरुन म्हणजेच ३६ टक्के दराने हप्ता महागला आहे. इतर पिकांना सर्वसाधारण विमा संरक्षणाच्या प्रतिहेक्टर विमा हप्ता दरामध्ये कोणतीही वाढ नसली तरी अतिरिक्त विमा संरक्षणाच्या विमा हप्ता दरात मोठी वाढ झाली आहे. यात भात पिकाचा विमा हप्ता दर १२ टक्क्यांवरुन १५ टक्के खरीप ज्वारीचा हप्ता ८.५० टक्के हप्त्यावरुन २० टक्के बाजरीचा हप्ता १९.५० टक्क्यांवरुन २० टक्के, तुरीचा हपता ९ टक्के दरावरुन तीन पटीपेक्षाही जास्त म्हणजेच ३० टक्के, उडीद पिकाचा प्रतीहेक्टर दर २४ टक्क्यांवरुन २७ टक्के, भूईमुगाचा दर १३ टक्क्यांवरुन १६ टक्के, तिळाचा दर १६ टक्क्यांवरुन १९ टक्के, सूर्यफुलाचा दर ६ टक्क्यांवरुन १८ टक्के वाढला. (प्रतिनिधी)
कपाशीसह विविध पिकांचा सर्वसाधारण विमा संरक्षणाचे तसेच अतिरिक्त विमा संरक्षणाचे प्रतीहेक्टर दर माफक असल्याचे आतापर्यंत विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र आता विमा हप्ता दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजण्याची वेळ आली आहे. यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.
- साहेबराव बनसोड, शेतकरी.

Web Title: Farmers in financial crisis due to crop insurance costlier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.