शेतकऱ्यांचा वीज कार्यालयात ठिय्या
By Admin | Updated: September 30, 2014 23:28 IST2014-09-30T23:28:45+5:302014-09-30T23:28:45+5:30
विद्युत वितरण कंपनीला अनेकदा निवेदने देऊनही शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा नियमीत खंडित होत आहे. यामुळे बिलनपुरा भागातील हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके धोक्यात आली आहेत.

शेतकऱ्यांचा वीज कार्यालयात ठिय्या
अधिकारी बेपत्ता : शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप
अचलपूर : विद्युत वितरण कंपनीला अनेकदा निवेदने देऊनही शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा नियमीत खंडित होत आहे. यामुळे बिलनपुरा भागातील हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके धोक्यात आली आहेत. यासाठी मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मात्र चार तासांपर्यंत एकही अधिकारी इकडे फिरकलाच नसल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकरी कार्यालयात; अधिकारी बेपत्ता
अचलपूर येथील बिलनपुरा भागातील शेतजमिनीकरिता सस्पेंन्स भागात विद्युत डी.पी. बसविण्यात आली आहे. शहरी भागातून ग्रामीण भागात या शेतकऱ्यांच्या शेतातील मोटरपंपाची विद्युत जोडणी करण्यात आली तेव्हा त्यांना प्रत्येकी एक दिवसाआड विद्युत पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सतत वर्षभरापासून त्रास दिल्या जात आहे. तोंडगाव परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा नियमित करुन बिलपुरा परिसरातील जवळपास सातशे शेतकऱ्यांच्या हजार हेक्टर शेताकरिता असलेले मोटर पंप बंद पडून आहेत. परिणामी केळी, संत्रा, कापूस, तूर सह भाजीपाला पिके करपू लागली असल्याचे निवेदन आज मंगळवारी दुपारी ४ .३० वाजता दिले.
सततच्या खंडित विद्युत पुरवठ्यामुळे त्रासलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याला परिस्थिती पाहण्यासाठी कार्यालय गाठले. परंतु सतत चार तास या कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित झाला नाही. अखेर कोकाटे नामक एका शाखा अभियंत्याला बोलावून निवेदन देण्यात आले. विद्युतबिल भरल्यानंतरही सततचा विद्युत पुरवठा खंडीत राहत असल्याने यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या व काही विपरीत घडल्यास त्याला विद्युत वितरण कंपनी जबाबदार राहाणार असल्याचे निवेदन पवन बुंदेले, मनीष लाडोळे, विनोद पोटे, गोकुल ककरानीया, हर्ष चौधरी, दिनेश पोटे, राजु केदार, सुधीर कपले, गणपत पोळे, काशिराम निचत या शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.