लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा मार्च महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक उपायोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. याच कालावधीत २०१९ मध्ये २४५ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. याच वर्षी १.१२ लाख शेतकऱ्यांना ८०८ कोटींची कर्जमाफी मिळाली असताना शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही, हा सरत्या वर्षात जिल्ह्यास हादरा आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन आहे. सलग तीन लॉकडाऊनमध्ये शेतकरी घरीच असल्यामुळे शेतकरी आत्महत्यामंध्ये कमी येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ अन् नापिकी यामुळे जगावे कसे या विवंचनेत, मुलामुलींचे शिक्षण, लग्न आदी प्रश्न भर टाकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे व शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे दुर्दैवी चित्र जिल्ह्यात आहे.यंदाच्या खरीपात सुरुवातीला कमी पाऊस, सोयाबीनच्या वांझोट्या बियाण्यांमुळे दुबारचे संकट व नंतर ऑगस्टपासून पावसाची लागलेली रिपरिप यामुळे खरीपाचे सोयाबीन, मूग व उडीद हातचे गेले. कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला व सततच्या पावसामुळे ८० टक्के पिकावर बुरशीजन्य रोगामुळे बोंडसडचे संकट उद्भवले. यामध्ये धीर खचून शेतकरी मृत्यूचा मार्ग अबलंबित असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आता शासन, प्रशासनासोबत समाजमनाने देखील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज निर्माण झालेली आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र निरंतरपणे कायम असून, शासनस्तरावरील उपाययोजना कूचकामी ठरत आहे.
लॉकडाऊन काळात बाजारपेठ उपलब्ध लॉकडाऊन काळात संसर्ग वाढू नये यासाठी बाजार समितीमधील भाजीपाला व फळ विक्री बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यास जागा दिली व पहिल्यांदा शेतकरीपुत्रांनी खुल्या बाजारात मालाची विक्री केली. दलाल, अडत्यांची साखळी बाद ठरविली. थेट उत्पादक ते ग्राहक असा नवा ट्रेंड या निमित्ताने समोर आलेला आहे.
१,१२,२५७ शेतकऱ्यांना ८०८.४७ कोटींची कर्जमाफी शासनाने दोन लाखांपर्यत थकीत रकमेची कर्जमाफी केली. या योजनेमध्ये १,३३,९४४ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. यापैकी १,१३,३७० शेतकऱ्यांनी खात्याचे आधार प्रमाणीकरण केलेले आहे. अद्याप ४,९०७ खात्याचे प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे. आतापर्यत १,१२,२५७ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी ८०८. ४७ कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे.
पावसाने खरीप उद्ध्वस्त, सरसकट मदत नाहीयंदाचा खरीप हंगाम अतिपावसाने बाद झाला. ८० टक्के सोयाबीन व कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाल्याने शासनाने संयुक्त पंचनामे केले. यात ३,१४,८६९ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. ३,४५,६९५ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या आपत्तीने हिरावला. यासाठी २३०.६८ कोटी २६ हजारांची मदत आवश्यक होती.