शेतकरी आत्महत्याग्रस्त १२२ कुटुंबांना दिवाळीसाठी मदत
By Admin | Updated: November 13, 2015 00:31 IST2015-11-13T00:31:42+5:302015-11-13T00:31:42+5:30
सलगची नापिकी, दुष्काळ यामुळे नैराश्य येऊन दरदिवशी शेतकरी आत्महत्या होत आहेत.

शेतकरी आत्महत्याग्रस्त १२२ कुटुंबांना दिवाळीसाठी मदत
जिजाऊ बँकेचा उपक्रम : प्रत्येक कुटुंबाला पाच हजारांचा धनादेश
तिवसा : सलगची नापिकी, दुष्काळ यामुळे नैराश्य येऊन दरदिवशी शेतकरी आत्महत्या होत आहेत. या परिवाराला धीर द्यावा, त्यांच्याही जीवनात दिवाळीचा प्रकाश पोहोचावा, यासाठी यंदा शेतकरी आत्महत्या झालेल्या १२२ कुटुंबांना जिजाऊ बँकेद्वारा प्रत्येकी ५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी हताश झाला आहे. त्याला सावरायची गरज आहे. या हेतूने जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अरविंद गावंडे व संचालक मंडळाने यंदा दिवाळीचे आदल्या दिवशी हा उपक्रम राबविला. या कुटुंबांना प्रत्येकी पाच हजारांचा धनादेश गावंडे यांनी दिला.
यामध्ये तिवसा तालुक्यातील अनिल पुरूषोत्तम वानखडे तिवसा, सुभाष अंबादास वानखडे गुरूदेवनगर, गोपाल डाहे दुर्गवाडा, मोहन येनोरकर शेंदूरजना खुर्द, शेखर शेळके मसदी, शामराव कोकाटे भीवापूर, पंकज टेकाडे करजगाव, देवीदास तायडे, सुभाष राठोड, शिदवाडी या कुटुंबांचा समावेश आहे. या कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणासाठीदेखील बँक सहकार्य करणार असल्याचे अरविंद गावंडे यांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबांना दिलासा मिळाला.(प्रतिनिधी)