आर्थिक संकटाच्या गर्तेत शेतकरी

By Admin | Updated: December 2, 2014 22:58 IST2014-12-02T22:58:43+5:302014-12-02T22:58:43+5:30

यंदाच्या हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस आल्यामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यामुळे उसणवारी घेऊन रबीची तयारी सुरू असताना शासकीय मदतीची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.

Farmer in the Future of the Financial Crisis | आर्थिक संकटाच्या गर्तेत शेतकरी

आर्थिक संकटाच्या गर्तेत शेतकरी

मदत केव्हा ? : उसणवारीवर दिवस काढण्याची वेळ
अमरावती : यंदाच्या हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस आल्यामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यामुळे उसणवारी घेऊन रबीची तयारी सुरू असताना शासकीय मदतीची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.
जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणी ३० टक्क्यावर आली. वर आलेली हरभऱ्याची रोप कोमेजायला लागली आहे. कापसावर लाल्या, तुरीवर शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रकोप वाढला. निसर्गाचा दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर झाला. मात्र, प्रत्यक्षात कुठलीच मदत नाही. शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अगदी उसणवारीवर दिवस काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम गारद झाला. पेरणीचा कालावधी संपून गेल्यामुळे मूग, उडीद पीक पेरण्यातच आले नाही. निकृष्ट बियाण्यांअभावी दुबार, तिबार पेरणीची वेळ आली, उगवलेल्या सोयाबीनला वाढीसाठी कालावधी मिळालाच नाही. शेंगा फुलोरावर व भरण्याच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्यामुळे शेंगा पोचट व दाणा बारकावला. परिणामी सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ६० ते ८० टक्क्यांनी घट झाली. एकरी एक पोत्याचीही झडती होत नसल्याचे विदारक चित्र आहे. शेतकऱ्याजवळ होता नव्हता पैसा पीक पेरणी, मशागतीमध्ये खर्च झाला. उत्पादन खर्चाच्या अर्धेही उत्पन्न पदरी पडले नाही. यंदा कपाशीचा आधारदेखील शेतकऱ्यांना मिळाला नाही. कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव आहे. जमिनीत ओलावा नसल्याने कपाशीची बोंड फुटत नाही. जी फुटली ती अर्धवट स्थितीत असल्यामुळे कपाशीच्या सरासरी उत्पन्नातदेखील ४० ते ६० टक्क्यांनी घट झाली आहे.
खरीप हातचा गेल्यानंतर रबी तरी साथ देईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु रबीचा हंगाम दीड महिना उशिरा झाला. परिणामी रबीची पेरणीदेखील उशिरा सुरू झाली. जमिनीत आर्द्रता नाही. त्यामुळे हरभऱ्याची उगवणशक्ती कमी होत आहे. वर आलेली हरभऱ्याची रोपे कोमेजायला लागली आहे. तूर बहरात आली. परंतु शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रकोप झाला, आर्द्रतेअभावी फुलगळ झाली. गत दोन वर्षांपासून आलेल्या संकटांनी शेतकरी डबघाईस आला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्मेही उत्पन्न नाही. खरिपाची आणेवारी ४६ पैसे जाहीर झाल्याने दुष्काळाच्या वास्तवावर शासनाने शिक्कामोर्तब केले. रोखीची मदत मात्र नाही. त्यामुळे दुष्काळाच्या दृष्टचक्रात शेतकऱ्यांसमोर अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. जगायचं कसं, दैनंदिन गरजा कशा भागवायच्या या विवंचनेत शेतकरी आहे.

Web Title: Farmer in the Future of the Financial Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.