तूर खरेदी केंद्रांना १० जूनपर्यंत मुदतवाढ
By Admin | Updated: June 4, 2017 00:07 IST2017-06-04T00:07:18+5:302017-06-04T00:07:18+5:30
जिल्ह्यासह राज्यातील तूर खरेदी केंद्रांना १० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र शासनाने शुक्रवारी उशिरा घेतला.

तूर खरेदी केंद्रांना १० जूनपर्यंत मुदतवाढ
केंद्र शासनाचे आदेश : यार्डात शिल्लक तुरीची प्रथम खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यासह राज्यातील तूर खरेदी केंद्रांना १० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र शासनाने शुक्रवारी उशिरा घेतला. त्यामुळे डीएमओव्दारा शनिवारी जिल्ह्यातील सर्व शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. केंद्राच्या या निर्णयानुसार सर्वप्रथम यार्डातील तूर खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर टोकन दिलेली तूर खरेदी करण्यात येणार आहे.
यापूर्वी तूर खरेदीची ३१ मेपर्यंतची मुदत होती व या योजनेला मुदतवाढ मिळाली नसल्याने जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदीचे १२ ही केंद्र गेल्या तीन दिवसांपासून बंद होते. परिणामी टोकन दिलेल्या २४ हजार ६९० शेतकऱ्यांची पाच लाख ३१ हजार २४३ क्विंटल तूर मोजणी व खरेदीअभावी पडून होती. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले असताना शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली येथे राज्यातील वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून होते. अखेर शक्रवारी उशिरा यावर तोडगा काढण्यात आला. यापूर्वीची तूर पुरवठा विभागाव्दारा खरेदी करण्यात येत होती. आता मात्र आधारभूत खरेदी योजनेंतर्गत तुरीची खरेदी केंद्राचा कृषी विभाग करणार आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात २४ हजार ६९० शेतकऱ्यांची ५ लाख ३१ हजार २४३ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. यामध्ये अचलपूर केंद्रावर २ हजार २७६ शेतकऱ्यांची ४७ हजार ६२६ क्विंटल, अमरावती केंद्रावर ४ हजार ३९४ शेतकऱ्यांची १ लाख २३ हजार ४५४ क्विंटल, अंजनगाव सुर्जी केंद्रावर २,५२५ शेतकऱ्यांची ४२,१७६ क्विंटल, चांदूरबाजार केंद्रावर १,५४६ शेतकऱ्यांची २९,३५० क्विंटल, चांदूर रेल्वे केंद्रावर १,८५८ शेतकऱ्यांची ३५ हजार ६१७ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर ३ हजार ३५३ शेतकऱ्यांची ८७,२८६ क्विंटल, धामणगाव केंद्रावर १,७९२ शेतकऱ्यांची ३१,७०० क्विंटल, धारणी केंद्रावर १२७ शेतकऱ्यांची १,६३० व्किंटल, मोर्शी केंद्रावर २,२२५ शेतकऱ्यांची ४४,८९१ व्किंटल, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर २,४४७ शेतकऱ्यांची ४७,९१२ क्विंटल, तिवसा केंद्रावर ९५३ शेतकऱ्यांची १४,९०८ क्विंटल व वरूड केंद्रावर ९५३ शेतकऱ्यांची १४,९०८ क्विंटल तूर खरेदी व मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.
यासंर्दभात शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर असलेली तूर प्रथम खरेदी करण्यात येईल. शनिवारी सर्व केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू करण्यात आली.
- अशोक देशमुख,
जिल्हा मार्के टिंग अधिकारी