एक्स्प्रेस हायवे पुन्हा गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:01:28+5:30
कोरोना संसर्गाची भीती बाळगून असणारे शेकडो लोक महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात जात असल्याचे चित्र आहे. नुकतीच काहीशी शिथिलता मिळताच मुंबई, पुण्याकडचे मजूर खासगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी असणारे विद्यार्थी तसेच इतर अनेक कारणास्तव अडकलेले शेकडो लोक त्यांच्या राज्याकडे जाण्यास धडपडताना दिसत आहे. पायदळ जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

एक्स्प्रेस हायवे पुन्हा गजबजला
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : बडनेरा शहरापासून जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेवर पुन्हा वाहनांची व पायदळ जाणाऱ्यांची गर्दी वाढली. मजुरांचे लोंढे आपल्या गावाकडे जाणाऱ्या मिळेल त्या वाहनांमध्ये जागा शोधताना दिसत आहेत.
कोरोना संसर्गाची भीती बाळगून असणारे शेकडो लोक महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात जात असल्याचे चित्र आहे. नुकतीच काहीशी शिथिलता मिळताच मुंबई, पुण्याकडचे मजूर खासगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी असणारे विद्यार्थी तसेच इतर अनेक कारणास्तव अडकलेले शेकडो लोक त्यांच्या राज्याकडे जाण्यास धडपडताना दिसत आहे. पायदळ जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ऑटोरिक्षा, सायकल्स, दुचाकी व खासगी तसेच ट्रकमध्ये मोठ्या संख्येत लोक गेल्या काही दिवसांपासून घराकडे जात असल्याचे चित्र आहे. १७ लोकांचे कुटुंब ज्यात महिला, लहान मुलांचा समावेश आहे, असे फलटणहून झारखंडकडे पायदळ जात आहे. त्यांनी बडनेरा शहरालगतच्या वाय पॉईंटवर विश्रांती घेतल्याची माहिती आहे. एक्सप्रेस हायवेवरून जाणाऱ्यांना वाय पॉईंट याठिकाणी सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवून दिले. रात्रंदिवस काही लोक याठिकाणी आळीपाळीने महामार्गावरून जाणाऱ्यांना सेवा देत आहेत. नाश्ता, जेवण, पाणी, विश्रांती तसेच प्राथमिक औषधोपचार दिले जात आहे. शेकडो लोकांना याचा लाभ मिळत आहे. या सत्कार्यात नितीन कदम, किशोर जाधव, राजू देवडा, नितेश गांग, शिवलाल बिसने, राहुल जाधव, योगेश संकलेचा, निलू काळे, उमेश पांडे, शिवा जाधव, पंकज कटारिया, महावीर देवडा यांच्यासह शहरातील अनेक लोक आपल्या क्षमतेनुसार सेवा देत आहेत. घरी जाण्याची ओढ असलेले परप्रांतीय मजूर, कामगार कुटुंबीयांना उपाशीपोटी दोन घास अन्न मिळत असल्याने ते धन्यवाद देत आहेत.
ऑटोरिक्षांची संख्या मोठी
मुंबईहून मोठ्या संख्येत ऑटोरिक्षा आपल्या कुटुंबांना घेवून घराच्या दिशेने जात आहे. उत्तरप्रदेश, बिहारकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ऑटोरिक्षा जवळपास दोन हजार किलोमिटरचा पल्ला गाठतो आहे. याचबरोबर पायदळ तसेच सायकलस्वार देखिल मोठा पल्ला गाठत असल्याचे चित्र महामार्गावर पहावयास मिळत आहे.