आरक्षित गटांसाठी उमेदवारांची चाचपणी
By Admin | Updated: October 13, 2016 00:26 IST2016-10-13T00:26:36+5:302016-10-13T00:26:36+5:30
जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे.

आरक्षित गटांसाठी उमेदवारांची चाचपणी
पेचप्रसंग : राजकीय पक्षांकडे उमेदवारांची वानवा
अमरावती : जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. त्याअनुषंगाने झेडपीच्या सर्कल आरक्षणाचे वेध राजकीय पुढाऱ्यांना लागले होते. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांचे आरक्षण ५ आॅक्टोबरला जाहीर झाल्यानंतर आता २३ राखीव गटांसाठी सक्षम उमेदवारांची राजकीय पक्षात वानवा आहे. त्यामुळे उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या जिल्हा परिषदेतील दिग्गजांना नव्या आरक्षणाने आणखी हादरा दिला आहे. जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या या नेत्यांवर त्यांचे हक्काचे गट आरक्षित झाल्याने राजकीय दृष्ट्या घरी बसण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे ५९ पैकी २३ गट अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे या गटामध्ये योग्य व सक्षम उमेदवारांचीे चाचपणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. बहुतांश आरक्षित जिल्हा परिषदेच्या गटात राजकीय पक्षांना उमेदवार मिळत नसल्याने दुसऱ्या ठिकाणचे इच्छूक पुढारी मात्र आरक्षित गटात निवडणूक लढण्यासाठी गटात व राजकीय पक्षाचे जिल्हास्तरावरील नेत्यांकडेही तिकीटा करिता लॉबीग करीत आहे. मात्र आरक्षित गटाचे तिकीटाकरिता स्थानिक पातळीवरील उमेदवारांना प्राधान्य देण्याकडे बहूतांश राजकीय पक्षांचा कल दिसून येत आहे. जर हा पर्याय मिळालाच नाही तर मात्र दुसरीकडील इच्छुकांचा विचार होऊ शकतो. त्यादुष्टीने काही पुढाऱ्यांनी जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ गटापैकी अनु.जाती ११ गट राखीव झाले. यामध्ये ६ गट महिलांसाठी आरक्षित आहेत तर ५ गट पुरूषांसाठी राखीव झाले आहेत. अनु. जमातीकरिता १२ गट राखीव ठेवण्यात आले आहेत. यात प्रत्येकी ६ महिला व पुरूषांकरिता आहेत. नामाप्र.साठी १६ जागा राखीव आहेत. यात प्रत्येकी ८ गट महिला आणि पुरूषांकरीता राखीव आहेत. याशिवाय सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण २० जागा असून यापैकी १० जागा आहे. यामध्ये राखीव गटातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छूक उमेदवारांची गर्दी कमी आहे. यातूनही निवडून येणारा व जनसंपर्क असलेल्यांना तिकिट देण्याची तयारी राजकीय पक्षाची आहे. मात्र काही ठिकाणी उमेदवार मिळत नसल्याने त्या गटाकरीता उमेदवारांची चाचपणी केली जात आहेत. (प्रतिनिधी)