उत्कंठा सर्वांनाच, अचलपुरात दिग्गज इच्छुक
By Admin | Updated: June 14, 2014 23:01 IST2014-06-14T23:01:04+5:302014-06-14T23:01:04+5:30
हिंदू, मुस्लिमांच्या कडव्या समर्थकांची किनार असलेल्या अचलपूर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस आणि भाजप या तीनही पक्षांचे उमेदवार राजकीय भवितव्य सुस्थापित करण्याच्या जोरकस प्रयत्नात आहेत.

उत्कंठा सर्वांनाच, अचलपुरात दिग्गज इच्छुक
सेनेची स्थिती वाईट : बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे चर्चेत
गणेश देशमुख - अमरावती
हिंदू, मुस्लिमांच्या कडव्या समर्थकांची किनार असलेल्या अचलपूर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस आणि भाजप या तीनही पक्षांचे उमेदवार राजकीय भवितव्य सुस्थापित करण्याच्या जोरकस प्रयत्नात आहेत. दोन टर्मपासून कुठल्याही राष्ट्रीय राजकीय पक्षाला पाय रोवता न येणाऱ्या या मतदारसंघात यावेळी काय घडते, याची मोठी उत्सुकता जिल्ह््याला आहे.
प्रहारचे बच्चू कडू अचलपूरचे आमदार आहेत. एकेकाळच्या या 'अँग्री' तरुणाने कुठल्याही राजकीय वारस्याशिवाय स्वत:ची छाप मतदारांच्या 'दिलां'वर उमटविली होती. रुग्ण, अपंग, शेतकरी यांच्यासाठी अव्याहतपणे कार्य करणाऱ्या या नेत्याच्या त्यावेळच्या आणि आताच्या व्यक्तिमत्त्वात तफावत जाणवत असल्याची चर्चा मतदारसंघातील नागरिक करतात.
अचलपूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख आणि माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख प्रबळ दावेदार आहेत. वसुधा देशमुखांचा अनुभव मोठा आहे. ज्येष्ठ लोकांनी उमेदवारी मागण्याऐवजी धावपळ होऊ शकेल अशा लोकांना उमेदवारी द्या, असा आग्रह धरणारा एक गट काँग्रेसमध्ये जोमाने सक्रिय आहे. बबलू देशमुख यांना जिल्हा परिषदेच्या, बँकेच्या अध्यक्षपदाचा अनुभव आहे. प्रशासनावर त्यांची पकड आहे. काँग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) आहेत. पक्षात मुख्यमंत्र्यांपर्यंत 'अॅप्रोच' आहे. बबलू देशमुख त्यामुळे काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा मानले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरावरील नेत्या सुरेखा ठाकरे यांनीही हा मतदारसंघ नियोजनबद्धरीत्या बांधला आहे. शरद पवारांच्या खास गोटातील सुरेखा ठाकरे हल्ली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. कामाचा धडाका मोठा आहे. वाणी गोड आहे. त्यांना आमदारकीची उमेदवारी मिळावी, असे मानणारा मोठा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे; तथापि अचलपूरची जागा नेहमी काँगे्रसच्याच वाट्याला आली आहे. यापूर्वी दोनवेळा काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. काँग्रेसच्या अपयशाचा हवाला देऊन यावेळी अचलपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावी, असा पराकोटीचा आग्रह राष्ट्रवादीकडून सुरू आहे.