कधी गाव मुक्काम, कधी झाडाखालीच सभा
By Admin | Updated: June 4, 2017 00:05 IST2017-06-04T00:05:19+5:302017-06-04T00:05:19+5:30
बळीराज्याच्या कर्जमुक्तीसाठी शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी अंतर्गत शिवार संवाद सभा, ही पंडित दिनदयाल उपाध्याय यांची संकल्पना,...

कधी गाव मुक्काम, कधी झाडाखालीच सभा
शेतकऱ्याशी थेट संवाद : पालकमंत्र्यांच्या शिवार सभेची ७७ गावात उपलब्धी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बळीराज्याच्या कर्जमुक्तीसाठी शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी अंतर्गत शिवार संवाद सभा, ही पंडित दिनदयाल उपाध्याय यांची संकल्पना, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्याचा जागीच निपटारा करणे, हे या संकल्पनेला अभिप्रेत, आदी स्वप्नवत वाटणाऱ्या बाबींना जिल्ह्यात मूर्तरूप मिळाले आहे. जिल्ह्याचे पालक या नात्याने ना.प्रवीण पोटे यांनी आठवडाभरात तब्बल ७७ गावांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधला. ही या अभियानाची उपलब्धी होय.
भर दुपारी झाडाखाली, कधी खाटेवर, तर कधी सतरंजीवर बैठक घेऊन शेतकरी व मंत्र्यामधला संवाद झाला. श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावा, यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी एक जागृत व जबाबदार मंत्री म्हणून पालकमंत्र्यांची धडपड त्यांच्या दौऱ्यात अनुभवास आली.
सर्वसामान्य नागरिकांच्या लोकप्रतिनीधी व शासनाकडून खूप काही अपेक्षा आहेत. आपल्या समस्या, अडचणी समजून घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे पाठविले आहे, या वाक्यापासून ना.पोटे संवाद साधण्यास सुरुवात करतात. काही लवाजमा नाही. व्यासपीठ, मंडप आदी काही नाही. सावलीचा आधार घेत सतरंजीवर बैठक मारलेले पालकमंत्री व उपस्थितांमध्ये मग सुरक्षित अंतराची बाधा राहत नाही व भीड चेपून थेट संवाद होतो. हेच या अभियानाच्या यशस्वीतेचे गमक असल्याचे दिसून आले. राज्यात गेल्या ७० वर्षांत अशा प्रकारचा संवाद प्रथमच होत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी बोलतांना सांगीतले.व जिल्ह्याचा पालक म्हणून हे आपले कर्तव्य आहे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शाश्र्वत शेतीव्दारे शेतकरी समृद्धीचा वसा शासनाने घेतला असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली.
मागील तीन वर्षांत राज्य शासनाने समाजातील शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवून धाडसाने निर्णय घेतले आहे. अंमलबजावणीमध्ये जर प्रशासनातील एखादा अधिकारी आपली जबाबदारी नीट पाळत नसेल त्याला वठणीवर आनन्यासाठी आपण समर्थ आहोत. कुठलाच संकोच न बाळगता आपणाकडे थेट तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले. कधी प्रेमाने तर कधी रागावून. मात्र, थेट संवाद संकल्पनेला कुठेही बाधा न येऊ देता पालकमंत्र्यांनी आठवडाभरात तब्बल ७७ गावांमध्ये थेट शिवार संवाद संकल्पना यशस्वीरीत्या राबविली. नागरिकदेखील प्रथमच असे अभियान अनुभवत असल्याने गावागावांत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
८.५० लाख क्विंटल तुरीची शासकीय खरेदी
जिल्ह्यात यंदा तुरीचे भरघोस उत्पादन झाले. खुल्या बाजारात भाव कमी असल्याने केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्याच्या उत्पादकतेच्या तुलनेत ५० टक्क्यांवर तूर खरेदी केली. सध्या ८.५० लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली. या केंद्रांना पुन्हा १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांजवळील सर्व तूर शासन खरेदी करणार आहे. यापूर्वीच्या सरकारने कधीच एवढी तूर खरेदी केली नव्हती, असे पालकमंत्र्यांनी सांगताच शेतकऱ्यांनीदेखील दुजोरा दिला.
स्थानिक कर्मचाऱ्यांवर नागरिकांचा रोष
गावपातळीवरील प्रशासनाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांविरुद्ध नागरिकांनी गाऱ्हाणी मांडली. दुजाभाव करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावर पालकमंत्र्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. काही गावांत हे कर्मचारी केव्हाही धाऊन येतात, याची ग्वाहीदेखील नागरिकांनी दिली.