‘सर्व्हिसबुक’मध्ये ‘त्रुटींचा’ बाजार
By Admin | Updated: September 13, 2016 00:16 IST2016-09-13T00:16:28+5:302016-09-13T00:16:28+5:30
सामान्य प्रशासन विभागाने अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांमध्ये सावळा गोंधळ घातला आहे.

‘सर्व्हिसबुक’मध्ये ‘त्रुटींचा’ बाजार
‘जीएडी’च्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह : अद्ययावतीकरण केव्हा ?
प्रदीप भाकरे अमरावती
सामान्य प्रशासन विभागाने अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांमध्ये सावळा गोंधळ घातला आहे. बहुतांश कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सर्विसबुकमध्ये त्रुटी आढळून आल्याने या विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
महापालिका आस्थापनेवर रुजू झालेल्या प्रत्येकाची वैयक्तिक सेवा पुस्तिका बनविली जाते. रजा, पदोन्नती, चारित्र्य पडताळणी, वार्षिक वेतनवाढ, वेतनश्रेणी, निबंधन, जातपडताळणी अशा साऱ्याच बाबींची यात नोंद घेतली जाते. मात्र, महापालिकेतील ७५ टक्के कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांचे अद्ययावतीकरणच करण्यात आले नाही. सेवापुस्तिका अर्थात सर्विसबुकमध्ये मागील पाच ते सात वर्षांपासूनच्या नोंदी न घेतल्याने काही अधिकारी-कर्मचारी वैतागले आहेत. काहींनी त्यातूनही स्वत:चे हित साधून घेतले आहे. सर्विसबुक अपडेट ठेवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभाग ‘जीएडी’ची आहे. तथापि अनेक कर्मचाऱ्यांच्या मूळ नस्ती या विभागाकडे उपलब्ध नाहीत. तर अनेकांच्या निलंबनाची, वेतनवाढ थांबविण्याची नोंद घेतलेली नाही. एकंदरीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सर्विसबुक त्रुटींचे माहेरघर बनले आहे. सेवा पुस्तिकांची पुनर्तपासणी झाल्यास आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेचे घबाड बाहेर पडण्याची शक्यता आहे. श्रीराम आगाशे, सुषमा मकेश्वर, सचिन पेपटकर, मदन तांबेकर, डी.पी. मेश्राम, सुनील पकडे, मनोज शहाणे, राजेश आगरकर, शैलेश बोरकर, दिनेश हंबर्डे, ए.ए. अवसरे, पी. जे. देशमुख, प्रमोद कुलकर्णी, पी. जे. देशमुख बी.के. तिरपुडे, एन.व्ही. आघाडे, आर. आर .तांबेकर, मंगेश कडू, शरद तिनखेडे, विवेक देशमुख, प्रमोद इंगोले, नितीन भाटकर आदी आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या ‘सर्विसबुक’मध्ये डझनावर त्रुटी नोंदविल्या गेल्या आहेत.
या आहेत त्रुटी
वेतन निश्चितीच्या नोंदीवर उपायुक्तांच्या स्वाक्षऱ्या नाहीत.
चारित्र्य पडताळणी व स्वास्थ्य प्रमाणपत्राची नोंद नाही.
वेतन वाढीच्या नोंदी घेतलेल्या नाहीत.
वेतन निश्चितीच्या नोंदींमध्ये तफावत
अधिकृत/अनधिकृत रजेच्या नोंदी नाहीत
विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद नाही.
जात पडताळणीची नोंद घेतलेली नाही.
राजपत्रात नाव बदलल्याची नोंद नाही.
अर्जित रजेचे लेखे अद्ययावत नाहीत.