साडेसहा हजार लोकांना रोजगार
By Admin | Updated: December 20, 2014 22:29 IST2014-12-20T22:29:46+5:302014-12-20T22:29:46+5:30
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत चार टेक्सटाईल्स कंपन्या येत आहेत. नव्याने तीन कंपन्यांसोबत करार प्रस्तावित आहे. या वस्त्रोद्योग कंपन्या सुरु झाल्यास जिल्ह्यात अडीच हजार कोटींची

साडेसहा हजार लोकांना रोजगार
नांदगावपेठ एमआयडीसीत अडीच हजार कोटींची गुंतवणूक
अमरावती : नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत चार टेक्सटाईल्स कंपन्या येत आहेत. नव्याने तीन कंपन्यांसोबत करार प्रस्तावित आहे. या वस्त्रोद्योग कंपन्या सुरु झाल्यास जिल्ह्यात अडीच हजार कोटींची गुंतवणूक होऊन साडेसहा हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी माहिती आ. सुनील देशमुख यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे नांदगावपेठ येथील टेक्सटाईल पार्कला ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत आहेत.
राज्यात मुंबईतील टाटा टेक्सटाईल मिल, इंदू मिल, पोतदार टेक्सटाईल मिल,सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील बंद असलेल्या मील या राष्ट्रीय वस्त्रोद्योग राज्याबाहेर नेण्याचा घाट रचला जात होता. ही बाब निदर्शनास आली तेंव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची १७ डिसेंबर रोजी भेट घेऊन वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. बंद असलेल्या मिल राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी ना. गडकरी यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांच्याशी चर्चा केली. हे प्रकल्प अमरावतीत सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन ना. गंगवार यांनी दिले. त्यामुळे ५०० हेक्टर क्षेत्रफळात टेक्सटाईल पार्क उभारण्याची वाटचाल सुरु आहे.
कापसाला हक्काची बाजारपेठ मिळणार
नांदगावपेठ येथे टेक्सटाईल पार्कमध्ये चार मिल साकारल्या गेल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळेल. कापड निर्मितीसाठी लागणारा कापूस कोणत्या दर्जाचा हवा, त्यानुसार प्रगत तंत्रज्ञान वापरुन कापसाचे उत्पादन घेतले जाईल. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्तेची दारे उघडी होतील. काही वर्षांपासून कापसाचा कमी झालेला पेरा वाढीस लागून शेतकरी कापूस उत्पादनाकडे वळतील, शेतकऱ्यांपर्यंत अर्थव्यवस्था पोहचेल, हे विशेष.
विमान सेवेने उद्योगधंदाचे युग येणार
बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरण व विकासाला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यात विकासाचे युग सुरु होण्याचे संकेत आहे. प्रारंभी बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नकार दर्शविला होता. मात्र राज्य शासनाने विदर्भात हवाईविश्व खुले करण्याचा निर्णय घेतल्याने बेलोरा विमातळाचा सर्वागिंण विकास होईल. ३०० कोटींचा हा प्रस्ताव असून शासनाने वेळीच निधी उपलब्ध करुन दिल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजकांना अमरावतीत ये-जा करणे सुलभ होईल, असे आ. सुनील देशमुख म्हणाले.