ग्राम स्वराज अभियानांतर्गत १५२३ कुटुंबांना वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:50 IST2018-05-06T22:50:11+5:302018-05-06T22:50:11+5:30
ग्रामस्वराज अभियानांतर्गत महावितरण अमरावती परिमंडळातील ३८ गावांतील १५२३ लाभार्थ्यांना, तर राज्यात १९२ गावांतील सुमारे ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे.

ग्राम स्वराज अभियानांतर्गत १५२३ कुटुंबांना वीजजोडणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामस्वराज अभियानांतर्गत महावितरण अमरावती परिमंडळातील ३८ गावांतील १५२३ लाभार्थ्यांना, तर राज्यात १९२ गावांतील सुमारे ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे २०१८ पर्यंत राज्यात 'ग्रामस्वराज अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानात 'सौभाग्य' योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावांत ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्ररेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे. अशा सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के वीजजोडणी देण्याचे उदिष्ट होते. त्यानुसार राज्याच्या २३ जिल्ह्यांतील १९२ गावात वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना ५ मे पर्यंत वीजजोडणी द्यावयाची होती. मात्र, महावितरणने हे उद्दिष्ट १ मे २०१८ रोजीच पूर्ण केले असून, या १९२ गावातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी दिली आहे. देशात महावितरणने सर्वात प्रथम उद्दिष्टांची पूर्तता केली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) प्रसाद रेशमे तसेच मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम केल्यामुळे राज्यातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना मागील १६ दिवसांत वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यात अमरावती परिमंडळातील ३८ गावांचा समावेश आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हयातील १३ तर अमरावती जिल्ह्यातील २५ गावांत अनुक्रमे ७८८ व ७३५ कुटुंबांना वीज जोडणी दिली. परिमंडळातील ३८ गावांतील वीज जोडणीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे.