जिल्हा उद्योग केंद्रावर वीज कोसळली
By Admin | Updated: August 14, 2015 00:53 IST2015-08-14T00:53:54+5:302015-08-14T00:53:54+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयावर गुरूवारी सकाळी १२ वाजताच्या सुमारास वीज कोसळली. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही.

जिल्हा उद्योग केंद्रावर वीज कोसळली
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयावर गुरूवारी सकाळी १२ वाजताच्या सुमारास वीज कोसळली. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. वीज कोसळल्याने या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ध्वजदंड खाली पडला व स्लॅबला १ फूट व्यासाचे भगदाड पडले. गुरूवारी सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू होती. नेहमीप्रमाणे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये कामकाज सुरू असताना मोठा आवाज झाला व विद्युत पुरवठा खंडित झाला. तळमजल्यावरील कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊन पाहिले असता दुसऱ्या मजल्यावरील झेंड्याचा पाईप खाली पडून किमान फुटभर व्यासाचे भगदाड स्लॅबला पडलेले आढळले.
जिल्हा उद्योग केंद्रावरील ध्वज वापरात नाही. तळमजल्यावर नव्याने ध्वजदंड तयार करण्यात आला आहे. दुसऱ्या मजल्यावरील या लोखंडी पाईपमुळे वीज आकर्षित झाली असावी, असा तर्क लावण्यात येत आहे. वीज कोसळल्याने जिन्याच्या भिंतीला तडा गेला आहे. तसेच केंद्रातील संगणकांमध्ये बिघाड होऊन काही महत्त्वाचा ‘डाटा’ खराब होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी यांनी सांगितले.
वायरिंंग जळाले, फ्यूज फेकले गेले
वीज कोसळल्याने जिल्हा उद्योग केंद्रामधील बहुतेक वायर जळाले आहेत. इमारतीच्या मीटर बॉक्समधील फ्यूज बाहेर फेकले गेले व सर्व यंत्रणा ठप्प झाली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या ईमारतीची पाहणी केली आहे.
९० टक्के ‘डाटा’ सुरक्षित
वीज पडल्याने जिल्हा उद्योग केंद्रामधील सर्व कॉम्प्युटर बंद पडले आहेत. यामधील ‘डाटा’ खराब होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्येक कर्मचाऱ्याजवळ ‘पेन ड्राईव्ह’ असल्याने ९० टक्के ‘डाटा’ सेव्ह आहे. तसेच नवीन कॉम्प्युटरमध्ये डाटा मिळविता येतो, असे उदय पुरी यांनी सांगितले.
अग्निरोधक यंत्रे नाहीत
मंत्रालयास लागलेल्या आगीनंतर प्रत्येक कार्यालयात अग्निरोधक यंत्रे लावण्यात आली होती. परंतु सध्या ही यंत्रे निरूपयोगी आहेत. नव्याने ही यंत्रणा लावण्यात आलेली नाही. १९८० च्या दरम्यान ही इमारत तयार करण्यात आली होती. वीज पडल्याच्या घटनेनंतर आपाद व्यवस्था, साहित्य असणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा उद्योग केंद्रात वीज पडल्याच्या घटनेनंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर व अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे उपस्थित होते.
गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान मोठा आवाज आला, वायर जळाल्याचा वास येऊ लागला, कार्यालयाची वीजदेखील खंडित झाली. तत्काळ काही कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊन पाहिले असता इमारतीवर वीज पडल्याचे दिसून आले.
- उदय पुरी, महाव्यवस्थापक,
जिल्हा उद्योग केंद्र.