जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दुर करण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST2021-02-06T04:20:58+5:302021-02-06T04:20:58+5:30
अमरावती: पंतप्रधान जलसिंचन योजना व बळीराजा सिंचन योजनेत समाविष्ट प्रकल्पांना निधी मिळण्यासाठी यापुर्वीच केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली. जिल्ह्यातील ...

जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दुर करण्यासाठी प्रयत्न
अमरावती: पंतप्रधान जलसिंचन योजना व बळीराजा सिंचन योजनेत समाविष्ट प्रकल्पांना निधी मिळण्यासाठी यापुर्वीच केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाचा जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दुर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रकल्प काही कारणाने बंद आहे. त्याचा आढावा मी अधिकाऱ्यांकडून घेऊन तातडीने प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. ते गुरुवारी येथील वऱ्हाडे मंगल कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. प्रकल्पाचे काम करताना वनविभागाची परवानगी, रेल्वे क्रॉसिंगचे प्रश्न दुर करण्यात येतील असेही ते म्हणाले.
शासनाने वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्प जोडण्याचे काम हाती घेतल्याचा उल्लेखही यावेळी त्यांनी केला. कोरोना काळात सरकारच्या तिजोरीत पैसे नव्हते. पण आता परिस्थिती सुधारत आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाला जीएसटीपोटी मिळणारे पैसे अद्यापही दिले नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी पत्रपरिषदेला माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले , गणेश खारकर यांचीही उपस्थिती होती.
बॉक्स:
महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचाच फार्म्युला
तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडी सरकार गुण्यागोविंदाने कारभार करीत आहे. होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच फार्म्युला राहणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. फक्त कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.