अमरावतीत धावणार ई-रिक्षा
By Admin | Updated: September 8, 2016 00:17 IST2016-09-08T00:17:00+5:302016-09-08T00:17:00+5:30
मुंबई आणि रायगड जिल्हा वगळता आता राज्यभरात ई-रिक्षा धावताना दिसतील.

अमरावतीत धावणार ई-रिक्षा
शासनाचा निर्णय : नियमावली जाहीर
अमरावती : मुंबई आणि रायगड जिल्हा वगळता आता राज्यभरात ई-रिक्षा धावताना दिसतील. यात अमरावतीचाही समावेश आहे. याशिवाय विभागातील बुलडाणा, अकोला या दोन शहरांमध्ये ई-रिक्षांना प्रायोगिक तत्वावर परवानगी दिल्यानंतर आता राज्य शासनाने उर्वरित जिल्ह्यातही ई-रिक्षांना परवानगी दिली आहे. केंद्रशासनाने ई-रिक्षाबाबत धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार दिल्लीत ई-रिक्षाचा प्रयोग राबविण्यात आला. तो यशस्वीही झाला. त्यामुळे या रिक्षांना अन्य राज्यातही परवानगी देण्यात आली. दिल्ली प्रमाणेच ई-रिक्षांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. गृहविभागाने ई-रिक्षांच्या परवान्यासाठी निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार ई-रिक्षाचालकाला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांना स्थानिक परिसराची माहिती असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना व सार्वजनिक वाहतूक करण्याचा परवाना (बॅच) असावा.
परवानाधारकाकडे पंधरा वर्षांच्या वास्तव्याचा दाखला असावा. रिक्षाचालकाला त्याचे नाव आणि नंबरसहित छोटा फलक लावावा लागणार आहे. ई-रिक्षांना आॅटोरिक्षाप्रमाणे शहराच्या कोणत्याही भागात प्रवास करता येणार नाही. दिलेल्या मार्गावरच प्रवासी वाहतूक करण्याचे बंधन त्याच्यावर राहणार आहे.
परवाने कोणाला मिळणार ?
केवळ सायकलरिक्षा चालविणाऱ्या चालक व मालकांना ई-रिक्षाचे परवाने देण्यात यावेत, तशी तरतूद नियमावलीत केली आहे. बहुतांश जिल्ह्यातून सायकलरिक्षा हद्दपार झाल्या आहेत. अमरावतीतही फार वर्षापूर्वीच सायकल रिक्षा बंद झाल्यात. त्यामुळे ई-रिक्षाचे परवाने कोणाला दिले जाणार, अमरावतीत या रिक्षा धावू शकणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.
महत्त्वाचे मुद्दे
ई-रिक्षामध्ये चार प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे.
या रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर लावणे सक्तीचे असेल.
रिक्षातून ४० किलोपर्यंतच्या वजनाच्या वस्तुंची वाहतूक करता येईल.
आरटीओकडून दरनिश्चिती केली जाणार आहे.