कोरोनाकाळात १५ हजार दिव्यांगाना मिळाली घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:29 IST2020-12-13T04:29:26+5:302020-12-13T04:29:26+5:30
अमरावती : लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची ...

कोरोनाकाळात १५ हजार दिव्यांगाना मिळाली घरपोच सेवा
अमरावती : लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची यंत्रणा सक्रिय झाली. यादरम्यान ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी हेल्पलाईन तयार करण्यात आली असून, आपत्कालीन सहायता कक्ष सुरू करण्यात आला. त्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ हजार १९३ दिव्यांग व त्यांच्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू, आरोग्यविषयक साहित्याचा घरपोच पुरवठा करण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांसोबत दिव्यांगांना अडचणींचा सामना करावा लागला. या व्यतिरिक्त, आवश्यक गरजा भागविण्यासाठीही त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या परिस्थितीचा विचार करून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने हालचाल करू न शकणाऱ्या महापालिका क्षेत्रातील ५ हजार ८५०, नगरपरिषद क्षेत्रातील २ हजार ५९९, ग्रामीण भागातील ६ हजार ७४४ दिव्यांगांना जीवनाश्यक वस्तूंची किट घरपोच पोहोचविली आहे.
या किटमध्ये धान्य, कडधान्य, डाळी, तेल, तांदूळ आदी वस्तू पुरविण्यात आल्या. कोरोना संसर्गापासून दिव्यांगाचे संरक्षण व्हावे, यासाठी आरोग्याविषयक किटमधून त्यांना सॅनिटायझर, मास्क, रुमाल, डेटॉल, फिनाईल घरपोच देण्यात आले. दोन हजार मास्क, १ हजार ९४४ सॅनिटायझर्स, १ हजार ४४ डेटॉल, फिनाईल पुरविण्यात आले. आपले पोट भरण्यासाठी आवश्यक शारीरिक क्षमता नसलेल्या २ हजार दिव्यांगांना जिल्हा परिषदेच्या दिव्यांग आपत्कालीन सहायता कक्षाने थेट घरपोच जेवण पोहचविण्याची व्यवस्था केली. यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन समाजकल्याण अधिकारी प्रशांत थोरात यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. ग्रामीण भागातील १४ तालुक्यांतील दिव्यांगांना तात्काळ मदत मिळावी म्हणून तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. हालचाल करू न शकणाऱ्या व गरजू दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे. आपत्कालीन सहायता कक्षाद्वारे मधुबन वृद्धाश्रम, विविध ग्रामपंचायतीमधील दिव्यांगांना जीवनाश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करून त्यांना जगण्यास बळ दिले.
बॉक्स
सामाजिक संस्थांनाही मदत
आमला विश्वेश्वर, हातखेडा (भातकुली), वाठोडा, नारायणपूर (तिवसा), गौलखेडा बाजार (चिखलदरा), कावली, बेलोरा धामक (नांदगाव खंडेश्वर), लेहगाव (मोर्शी), सार्सी, वाटपूर येथील दिव्यांगांना कोरोनाकाळात तातडीने जीवनाश्यक वस्तू पुरविण्यात आल्या. यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली. दी ब्लाईंड वेल्फेअर असोशिएशन, रोटरी क्लब ऑफ अमरावती, अपंग कल्याण संस्था, प्रहार अपंग क्रांती संघटना, रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट, ओसवाल या सामाजिक संस्थांसह महापालिका ते ग्रामीण स्तरावरील ६० विविध संस्थांनी अन्नधान्य, मास्क, सॅनिटायझर, जेवणाचे डब्बे वाटपाच्या कार्यात सहभागी झाल्या, अचलपूर येथील १५, तिवसा येथील ८, धामणगाव व चांदूर बाजार येथील प्रत्येकी ५, शेंदूरजनाघाट येथील ६ अशा सामाजिक संस्थांनी जिल्हा परिषदेच्या आपत्कालीन कक्षाशी समन्वय साधून कोरोना काळात दिव्यांगांना मदत करण्यात मोलाची भूमिका बजावली.