धान्य बाजारावर दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: March 8, 2015 00:05 IST2015-03-08T00:05:21+5:302015-03-08T00:05:21+5:30
शेतकऱ्यांना झालेले अल्प उत्पन्न, वाढलेला वाहतूक खर्च त्यामुळे शेतकरी खर्चापूरतेच धान्य बाजारात विक्रीकरिता आणत आहेत.

धान्य बाजारावर दुष्काळाचे सावट
अमरावती : बँंकेचे कर्ज एकरकमी परत द्यावे लागत असल्याने आता बहुतांश शेतकरी शेती हंगामासाठी बचत गटातून कर्ज घेत आहेत. त्यामुळे बचत गट शेतकऱ्यांचा आधार ठरत आहेत.
निपाणी देवरी येथील ६८ वर्षीय शेतकरी लक्ष्मण कोसमकार यांच्याकडे ४ एकर शेती आहे. दरवर्षी उत्पादन खर्च वजा जाता काहीच उरत नसून २०१४ मध्ये त्यांनी खरीप पिकांसाठी बचतगटाकडून २० हजार रुपये कर्ज घेतले. त्याआधारे सोयाबीन, तुरीची लागवड केली. मात्र, ऐन फुलोरावर सोयाबीनचे पीक असताना पावसाने दांडी मारल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. तसेच तूर पिकावर अळ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पिकही बुडाले. त्यामुळे कोसमकार यांना बचतगटाचे कर्ज फेडणे अशक्य होते. मात्र महिन्याचे व्याज वरचेवर भरल्याने मुद्दल देण्यासाठी अवधी मागितला. नंतर पैशाची तडजोड करून रबी हंगामात दोन एकरात हरभऱ्याची पेरणी केली. त्यातही हरभरा संवगणीदरम्यान वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मोठी फजिती झाली. पण पर्याय नव्हता. कारण खरीप पीक बुडाले. कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. ही भिस्त हरभरा पिकावर असल्याने धावपळीत नियोजन केले. मळणीयंत्र बोलावून हरभरा काढला. ज्यांनी संकटात हातभार लावला त्याचे देणे अगत्याचे समजून थेट मशीनमधून काढलेला हरभरा अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणला आहे. (प्रतिनिधी)
मासिक व्याजदराची सवलत
बचत गटापेक्षा बँकेचे कर्ज का घेत नाही, असे शेतकरी कोसमकार यांना विचारले असता ते म्हणाले, बँकेचे कर्ज घेतल्यास एकदम व्याजासह द्यावे लागतात. एकतर निसर्गाची साथ नाही. त्यामुळे जेमतेम हाती आलेले पीक तोकडे, त्यात बँकेची एकरकमी द्यावी लागणारी देणी अशक्य होते. म्हणूनच बचत गटाकडून कर्ज घेणे परवडते.
एका मुलाचा आधार
लक्ष्मणराव कोसमकार यांना दोन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा यवतमाळ येथे बसस्थानकावर गोळ्या-बिस्किटे विकून आपल्या संसाराचा गाडा हाकतो. त्यामुळे ते मदत करू शकत नाही. उलट आम्हीच त्याला देतो. दुसरा मुलगा अमरावतीत येऊन गवंडी काम करतो. त्याच्या मजुरीवर घरखर्च चालते. सत्तरीच्या उंबरठ्यावर आल्यानंतर या मुलाच्या आधारे शेतीची कामे करीत आहे, असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.