पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले

By Admin | Updated: June 23, 2014 23:39 IST2014-06-23T23:39:29+5:302014-06-23T23:39:29+5:30

देशाच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असताना सुखी संपन्न असलेला बळीराजा आज देशोधडीला लागला आहे. २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Due to the absence of rain, farmers' dreams were broken | पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले

वरुड : देशाच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असताना सुखी संपन्न असलेला बळीराजा आज देशोधडीला लागला आहे. २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतकरी पेरणीकरिता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. महागाईमुळे मजुरीचे दरसुध्दा वधारल्याने शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूर सुखी, असे म्हणण्याची वेळ आली आहे. यामुळे समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा कोणाला कळणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यावर्षी कोरडा दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, व्यापाऱ्याकडून सातत्याने होणारी शेतकऱ्यांची लूट आणि व्यापाऱ्यांना पाठीशी घालणारे राजकारणी असा त्रिकोण तयार झाला आहे. एकामेकांवर कुरघोडी करुन झटपट श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात शेतकरी भरडला जात आहे. शासन शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचे अधिक हित जोपासते. कृषी विभागाचे अधिकारी केवळ बोटावर मोजण्याइतक्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ देतात. एवढेच नव्हे तर ७० टक्के शेतकऱ्यांना कृषी विभागाचे कार्यालयदेखील माहीत नाही. कारण कार्र्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांना खुर्चीसोबत संवाद साधावा लागतो. शेतकऱ्यांच्या कार्यशाळांना शेतकरीच अनुपस्थित असतात, असा गवगवा होतो. परंतु राजकारणी यातही राजकारण करतात. या देशाचा खरा शेतकरी कोण हे शोधण्याची वेळ आली आहे. राजकारणीच शेतकरी, व्यापारी आणि उद्योगपती बनतात. यामुळे शेतकऱ्यांची वाट लागली आहे. शेतीच्या मशागतीसाठी महिलांचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. काही गर्भश्रीमंत शेतकऱ्यांनी मिरची, कपाशी ठिंबक सिंचनावर लावली असली तरी निसर्गाच्या पावसाशिवाय तिची वाढ खुंटत आहे. तर तापमानसुध्दा मोठ्या प्रमाणावर असल्याने ठिबक सिंचनावर घेतली जाणारी पिकेसुध्दा करपू लागली. तसेच विद्युत भारनियमनाला सुध्दा शेतकरी कंटाळले असल्याने तुषार किंवा ठिबक सिंचन चालविणे दुरापास्त झाले आहे. संत्रा उत्पादक शेतकरी मृग बहराच्या फुटण्याची वाट पाहत असून पावसाअभावी शेतकऱ्यांची ही परवड होत आहे. मृगाने दगा दिल्याने आंबिया बहराचीही फूट नाही. कपाशी, सोयाबीन, तूर पिकासह आदी पिके २० दिवसांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Due to the absence of rain, farmers' dreams were broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.