नव्या आमदारांना ‘दिवाळी स्पेशल फटाके’
By Admin | Updated: October 25, 2014 22:32 IST2014-10-25T22:32:56+5:302014-10-25T22:32:56+5:30
विधानसभा निवडणूक नुकतीच आटोपली. अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या निवडणुकीचे ‘लालित्य’ अद्यापही संपलेले नाहीत. सोशल मीडियावरही निवडणूक प्रचंड गाजली. नवे आमदार जाहीर झाले

नव्या आमदारांना ‘दिवाळी स्पेशल फटाके’
अमरावती : विधानसभा निवडणूक नुकतीच आटोपली. अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या निवडणुकीचे ‘लालित्य’ अद्यापही संपलेले नाहीत. सोशल मीडियावरही निवडणूक प्रचंड गाजली. नवे आमदार जाहीर झाले आणि लगोलग दिवाळी आली. लागलीच ‘व्हॉट्स अप’वर या दिवाळी आणि आमदारांची सांगड घातली जाऊ लागली. अमरावती जिल्ह्यातील नवीन आमदारांच्या नावे ‘दिवाळी स्पेशल फटाके’ या मथळ्याखाली भन्नाट शुभेच्छा संदेशांचे ‘सर्फिंग’ सुरू आहे.
हे ‘दिवाळी स्पेशल फटाके’ लावताना ‘कृपया मनावर घेऊ नये..’ असा सावध पवित्राही घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील आठही नवनिर्वाचित आमदारांच्या एकूण कारकिर्दीला आणि मारलेल्या मैदानाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ‘शायरी’च्या स्वरूपात हे अर्थपूर्ण संदेश तयार करण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील सर्वात रोचक ठरलेल्या देशमुख-शेखावतांच्या लढतीमध्ये रावसाहेबांना पराभूत करून मताधिक्याने निवडून आलेल्या सुनील देशमुखांसाठी
‘पांच साल पहले जो
आॅपरेशन तू छोड गया
आज उसे पुरा करने का
मौका फिरसे आ गया’
ही अर्थपूर्ण शायरी तयार झालीय.
निवडणुकीदरम्यान किराणा वाटण्याच्या मुद्यावरून चर्चेत राहिलेल्या रवी राणांसाठी,
‘अब गरीब को काम दे,
किराना नही
क्योंकी तू खुद युवा है,
पुराना नही’
हे थेट शरसंधान साधण्यात आले आहे.
भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या अरूण अडसड यांचा अटीतटीच्या निवडणुकीत पराभव करून ‘सिंकदर’ठरलेल्या वीरेंद्र जगताप यांच्यासाठी तयार करण्यात आलेला शेरही बराच रोचक आहे,
‘इतना भी गुमान न कर
अपनी जीत पर ऐ बेखबर
शहर में तेरी जित से
ज्यादा चर्चे तो मेरी हार के है’
जय-पराजयाचे अन्वयार्थ काढण्यात सोशल मीडियाही मागे नाही, हेच यावरून स्पष्ट होते.
अचलपूर मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक साधणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर तर स्तुती सुमनांचा वर्षावच झालाय,
‘राजनीति की कौनसी
किताब पढते हो भाई,
तिसमारखानों की करते हो
हर बार धुलाई’
या शायरीतूून कडूंना त्यांच्या विजयाचे गुपितच विचारण्यात आले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले अनिल बोंडे यांच्यासाठी,
‘इंजेक्शन लगाते है अमरावती में
मरीज झुम उठता है मोर्शी में’
अशी रचना करून त्यांच्या कार्यपध्दतीवर शेरेबाजी करण्यात आली आहे.
खासदारपुत्र अभिजित अडसूळ यांचा पराभव करून विजय नोंदविणाऱ्या नवख्या रमेश बुंदिलेंच्या नावाचा सुरेख वापर करून रचलेल्या चार ओळी रचणाऱ्याच्या कल्पकतेची दाद द्यायला लावतात,
‘कप्तान के हवाई जहाज के
कर दिए पुर्जे ढिले
लोग बांटे मिठाई
और साहब कहे
‘ले बुंदी ले..
महिला असूनही कडवी झुंज देऊन विजयावर शिक्कामोर्तब करून स्वत:ची आणि पक्षाची प्रतिमा उंचावणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्यासाठी,
‘एक नारी सब पे भारी
असमंजस में रहे दुनिया सारी’
या शायरीतून त्यांना सॅल्युटच ठोकलेला दिसतो. मेळघाट मतदारसंघातून निवडून आलेले प्रभुदास भिलावेकर यांच्यासाठी,
‘शिवराज की रॅली झकास
प्रभू के दास हो गये पास’
या ओळींची रचना करून त्यांच्या विजयाची कारणमीमांसा अगदी स्पष्ट आणि परखडपणे केल्याचे दिसते.
व्हॉट्स अॅपवरील एका ग्रुपमध्ये सध्या या संदेशांचे वेगात आदानप्रदान सुरू आहे. (प्रतिनिधी)