आठ राष्ट्रीयीकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस
By Admin | Updated: July 3, 2015 00:32 IST2015-07-03T00:32:46+5:302015-07-03T00:32:46+5:30
खरीप २०१५ च्या हंगामात शेतकरी आर्थिक कोंडीत असताना पीककर्ज वाटपात कुचराई करणाऱ्या आठ राष्ट्रीयीकृत बँकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर भूमिका घेतली.

आठ राष्ट्रीयीकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस
पीककर्ज वाटपाची गती मंद : सेक्शन १८८ आयपीसीनुसार कारवाई
अमरावती : खरीप २०१५ च्या हंगामात शेतकरी आर्थिक कोंडीत असताना पीककर्ज वाटपात कुचराई करणाऱ्या आठ राष्ट्रीयीकृत बँकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर भूमिका घेतली. शासन आदेशांचे पालन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या बँकांना सेक्शन १८८ आयपीसी अन्वये नोटीस बजावली आहे.
बँकांद्वारा शासन निर्देशांचे पालन होत नसल्याने पीककर्ज वाटपाचा टक्का माघारला, याविषयी गुरुवारच्या अंकात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. हे प्रकरण पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय गांभीर्याने घेतले आहे. पीककर्ज वाटपात माघारलेल्या अलाहाबाद बँक, देना बँक, आयडीबीआय बँक, बँक आॅफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, अॅक्सीस बँकेसह एचडीएफसी बँकेला गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप २०१५ च्या हंगामात सुमारे ११०० कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. ही टक्केवारी ६४ टक्के आहे. मागील वर्षी सप्टेंबर २०१४ पर्यंत १००० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले होते, हे विशेष.