पथ्रोट परिसरात कपाशीवर मर रोगाचे संकट
By Admin | Updated: August 10, 2015 00:05 IST2015-08-10T00:05:40+5:302015-08-10T00:05:40+5:30
अचलपूर तालुक्यातील पथ्रोट परिसरात कपाशीच्या पिकावर मर रोगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

पथ्रोट परिसरात कपाशीवर मर रोगाचे संकट
बळीराजा चिंताग्रस्त : रोगाचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी सुरू
पथ्रोट : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट परिसरात कपाशीच्या पिकावर मर रोगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
पथ्रोट परिसरातील मौजे जहानपूर, मलकापूर, वागडोह, रामापूर, कासमपूर, जवळापूर भागातील कपाशी पिकावर मर रोगाचे आक्रमण झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी या परिसरात ७० टक्के कपाशी पिकाची पेरणी केली. त्यामध्ये ४० टक्के शेतकऱ्यांनी प्री- मानसून कपासीची पेरणी केली. त्यामुळे प्री-मान्सून कपाशी पिके फुल-पात्यांनी बहरले होते. ३० टक्के शेतकऱ्यांनी ओलिताची सोय नसल्यामुळे मृग नक्षत्रामध्ये आलेल्या पावसामुळे कपाशी पिकाची पेरणी केली होती. या सर्व पिकांवर दोन दिवसपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी पिकावर मर रोग आल्याने मोठ्याप्रमाणात कपाशीची पिके सुकू लागली आहे. त्यामुळे पीक घरात येण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर विरजण पडले आहे.
बी.टी. कपाशी पिकावर कोणत्या प्रकारचा रोग येत नाही, अशी शेतकऱ्यांची धारणा झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमामात बी.टी. कपाशीचे वाण व वेगवेगळ्या जाती व कंपन्यांच्या वाणाची पेरणी करतात. मात्र बी.टी. कपाशीवर दरवर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने मर रोगाचे आक्रमण होतात. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. कृषितज्ज्ञांकडून यावर संशोधन करणे काळाची गरज झाली आहे. शेतकऱ्यांनी या पिकावर आतापर्यंत केलेला खर्च व मेहनत वाया गेली असून शेतकरी डबघाईस आल्याचे चित्र आहे.
मागील वर्षीसुध्दा गारपीट, वादळ, पावसाचा लहरीपणा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातून कसाबसा थोडाफार सावरला तर मर रोगाच्या संकटात सापडला. दरवर्षी नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी कर्ज बाजारी होत चालण्याचे चित्र असून जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे प्रमाण आहे. सर्वेक्षणाची मागणी आहे. (वार्ताहर)