आपत्ती व्यवस्थापन विभागाला सरावाची गरज
By Admin | Updated: June 23, 2015 00:45 IST2015-06-23T00:45:48+5:302015-06-23T00:45:48+5:30
अमरावती जिल्हा आपत्तीप्रवण आहे. वर्षभर आग, पूर, वीज, चक्रीवादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तींचा मारा सुरु असतो.

आपत्ती व्यवस्थापन विभागाला सरावाची गरज
अतिवृष्टीचा इशारा : शोध, बचाव पथकाची लगबग
अमरावती : अमरावती जिल्हा आपत्तीप्रवण आहे. वर्षभर आग, पूर, वीज, चक्रीवादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तींचा मारा सुरु असतो. सध्या मान्सूनचे दिवस आहेत. अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका असलेले शोध व बचाव पथकाने साहित्य बाहेर काढले आहे. या पथकाला नियमित सरावाची गरज आहे.
नागपूर व पुणे वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन सजग झाले आहे. आपत्तीमध्ये होणारी जीवित हानी, वित्तहानी कमी करण्यासाठी व आपत्तीचा प्रतिबंध करण्यासाठी शोध व बचाव कार्य गतिमान पध्दतीने व सुरळीतपणे राबविण्यात यावे यासाठी पथकाला नियमित सराव व प्रशिक्षणाची गरज आहे.
उपविभागीय कार्यालयांना यापूर्वीच २७ सर्चलाईट, २७ मेगाफोन, ४ ईमरजन्सी आॅक्सिजन कीट, १५ बॉब रोप, १५ इन्सुलेटेड फायरमन अॅक्स, ३० फायर एक्सिंग एअर, ३० रबर ग्लोव्हज, ३० लेदर ग्लोव्हज, ६ बोट, २०७ लाईफ जॅकेट, १११ लाईफ बायरींग, ५ ट्रॅक वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात २ रबरी बोटी तयार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह १४ ही तालुक्यात आपत्कालीन कक्ष सुरु आहेत. (प्रतिनिधी)
'ते' ५० लाख
अद्यापही पडून
आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्याला मागील वर्षी ५० लाख रुपये प्राप्त झाले. यापैकी २० लाखांचे साहित्य खरेदी व ३० लाख रुपये प्रशिक्षणावर खर्च करण्यात येणार होते. परंतु या प्रस्तावाला मंत्रालयाकडून एक वर्षापासून मंजुरी न मिळाल्याने ५० लाखांचा निधी अखर्चीत आहे.