धारणी, दर्यापूर, अंजनगावात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 01:05 IST2016-07-13T01:05:02+5:302016-07-13T01:05:02+5:30
चार दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने ग्रामस्थांची पार दैनावस्था झाली आहे.

धारणी, दर्यापूर, अंजनगावात अतिवृष्टी
जनजीवन विस्कळीत : चार तालुक्यांतील सहा गावांना फटका
अमरावती : चार दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने ग्रामस्थांची पार दैनावस्था झाली आहे. १४ तालुक्यापैकी धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. यात धारणीत सर्वाधिक १५७.४ मिमि पाऊस पडला.या अतिवृष्टीने हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे.
दर्यापूर व अंजनगाव सुर्जी या दोन तालुक्यात प्रत्येकी ७१ मिमि पावसाची नोंद झाली.मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३८.२ मिमि पाऊस पडला. मागील ७२ तासांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच मोठ्या नदी-उपनदी आणि नाल्यांना पूर आल्याने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत ५४ टक्के पाऊस जिल्ह्यात कोसळला आहे.जिल्ह्यात १ जून ते १२ जुलैदरम्यान २५३ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४४०.१ मिमी अर्थात १७३.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तिवसा तालुक्यात आतापर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ७५.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात ८१४.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात १२ जुलैपर्यंत ४४०.१ मिमी पाऊस पडला.