मागणी वाढली, रक्तदान घटले
By Admin | Updated: June 1, 2015 00:40 IST2015-06-01T00:40:56+5:302015-06-01T00:40:56+5:30
उन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या रोडावल्याने रक्त संकलनावर मोठा परिणाम झाला आहे.

मागणी वाढली, रक्तदान घटले
वैैभव बाबरेकर ल्ल अमरावती
उन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या रोडावल्याने रक्त संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. दर दिवसाला ३५ ते ६० रक्त पिशव्यांची आवश्यकता आहे. मात्र, रक्तदान कमी झाल्याने रुग्णांना रक्तासाठी भटकंती करावी लागत आहे.
रक्तदानात अमरावती जिल्हा अग्रेसर आहे. येथे रूग्णांची रक्ताची गरज सहजरीत्या भागते. मात्र, सद्यस्थितीत उन्हाळा असल्याने रक्तदान शिबिरांच्या आयोजनात घट आली आहे. त्यामुळे रक्तसंकलनावर मोठा प्रभाव पडला आहे. गेल्या काही वर्षांची आकडेवारी लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचा रक्तसंकलनामध्ये मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच बीपीएलधारक रुग्णांना मोफत व गरजूंना वेळीच रक्तपुरवठा करण्यात इर्विनची रक्तपेढी सक्षम आहे. उन्हाळ्यात शाळा-महाविद्यालये बंद असतात. अशावेळी विद्यार्थी रक्तदान करीत नाहीत. काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरिबांना रक्ताचा पुरवठा करतात.
मात्र, उन्हाळ्यात रक्त संकलनात घट होते. मागणीच्या तुलनेत रक्त संकलन कमी होत असल्याने रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. इर्विनच्या रक्तपेढीच्या माध्यमातून वर्षभरात विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात येतात. त्यामुळे रक्तदानाची टक्केवारी काही प्रमाणात स्थिर आहे. वाढत असलेली लोकसंख्या, वाढते आजार व अपघातांची वाढती संख्या यामुळे रक्ताची मागणीसुध्दा वाढली आहे. मात्र, वर्षभरात उन्हाळ्यात रक्तदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात इर्विनच्या रक्तपेढीने रक्तदानाचा टक्का टिकवून ठेवला.
चार वर्षांच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल महिन्यात ९५० पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले. इर्विनच्या रक्तपेढीतून डफरीन, सुपर स्पेशालिटी, टीबी रुग्णालयाला रक्ताचा पुरवठा केला जातो. खासगी रक्तपेढीलाही गरजेनुसार रक्त पुरविले जाते.
दिवसाला ३५ ते ६० रक्तपिशव्यांची गरज
उन्हाळ्यात महाविद्यालये-शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी रक्तदान करीत नाहीत. त्यातच उन्हामुळे बाहेर शिबिरे घेता येत नाहीत. रक्तदानामुळे उन्हाळ्यात शारीरिक अडचणी वाढतात. त्यामुळे रक्तदाते रक्तदान करण्यास धजावत नाहीत. रक्तदान कमी होत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ शकते.
-अविनाश उकंडे, जिल्हा रक्त संकलन अधिकारी, इर्विन रक्तपेढी.
रक्तदान केल्याने अनेक फायदे होतात. शरीरातील रक्त दिल्यावर नवीन रक्त तयार होते. त्यातच रक्तदानामुळे नागरिकांचे जीव वाचतात. रक्तदान काळाची गरज असून नागरिकांनी रक्तदानात पुढाकार घेतला पाहिजे.
-उमेश आगरकर, जनसंपर्क अधिकारी, इर्विन रक्तपेढी