पदवी, पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला मिळणार मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST2020-12-04T04:34:10+5:302020-12-04T04:34:10+5:30
अमरावती : अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका नाही. अशातच प्रवेशाची मुदत संपत असल्याने पुढील अभ्यासक्रमात प्रवेश कसा ...

पदवी, पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला मिळणार मुदतवाढ
अमरावती : अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका नाही. अशातच प्रवेशाची मुदत संपत असल्याने पुढील अभ्यासक्रमात प्रवेश कसा करावा, ही चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना आहे. मात्र, विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी तब्बल १५ ते २० दिवसांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर शुक्रवारी आयोजित विद्धत परिषदेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षांचे नियोजन केले. तसेच ३ नोव्हे्ंबरपासून निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली. मात्र, निकाल जाहीर करताना अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका विद्यापीठात पोहचल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने पदवी, पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला. पदवीसाठी ३० नोव्हेंबर, तर पदव्युत्तर प्रवेशासाठी ४ डिसेंबर अशी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, बीएस्सी सत्र ६ चे सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांपैकी ८ हजार विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिका मिळालेली नाही. या विद्यार्थ्यांनी कधी प्रवेश घ्यावा, हा गंभीर प्रश्न
उपस्थित झाला आहे.
-----------------
बॉक्स
चौथ्या दिवशीही ‘विथहेल्ड’ची गर्दी
अमरावती विद्यापीठ अंतर्गत अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यातून ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी गुरूवारी चौथ्या दिवशीही विद्यार्थ्यांची गर्दी कायम होती.
एका खिडकीहून दुसऱ्या खिडकींवर विद्यार्थ्यांच्या येरझारा दिसून आल्यात.
------------
कोट
विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांत पदवी, पदव्युत्तर प्रवेशापासून कुणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही. प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळेल, अशी तयारी विद्यापीठाने चालविली आहे. शुक्रवारी विद्धत परिषदेत याविषयी निर्णय होईल.
- राजेश जयपूरकर, प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.