मृत्युला हरवून जयश्रीचा पुन्हा गृहप्रवेश!

By Admin | Updated: September 13, 2016 00:09 IST2016-09-13T00:09:50+5:302016-09-13T00:09:50+5:30

सासरच्यांनी वर्षभर घरात कोंबून ठेवलेली जयश्री दुधे ही मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडली असून आज तिने दुसऱ्यांदा गृहप्रवेश केला.

Defeat death, Jayashree returns home again! | मृत्युला हरवून जयश्रीचा पुन्हा गृहप्रवेश!

मृत्युला हरवून जयश्रीचा पुन्हा गृहप्रवेश!

वैभव बाबरेकर अमरावती
सासरच्यांनी वर्षभर घरात कोंबून ठेवलेली जयश्री दुधे ही मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडली असून आज तिने दुसऱ्यांदा गृहप्रवेश केला. मोठ्या हिमतीने तिने विपरित परिस्थितीत जीवनाची अर्धी लढाई जिंकली असून तब्बल ४३ दिवसांच्या उपचारानंतर जयश्रीला पारश्री रूग्णालयातून सोमवारी सुटी देण्यात आली. आता ती निटनेटकी बोलू व चालू लागली असून तिने ‘लोकमत'सह आ.यशोमती ठाकूर व तिला मदत करणाऱ्या काही समाजसेवींचे आभार मानलेत.
कुऱ्हा येथील माहेरवासिनी जयश्री दुधे हिच्या पतीच्या निधनानंतर माहूर येथील सासरच्या मंडळींनी तिच्यावर नाना अत्याचार केलेत. एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल वर्षभर तिला अन्न-पाण्याविना अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवण्यात आले. तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला कुऱ्हा येथे माहेरी आणून टाकून दिले. वडिल भाऊराव सदाशिव कुऱ्हाडे यांनी तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. जयश्रीवर झालेल्या अन्यायाला 'लोकमत'ने वाचा फोडल्यानंतर पोलीस प्रशासनासह आरोग्य यंत्रणा जयश्रीच्या मदतीला धावली. जयश्रीवर अन्याय करणाऱ्या सासरच्या मंडळींवर तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. जयश्रीच्या वेदना व व्यथा लक्षात घेता आ.यशोमती ठाकूर यांनीही तिला मदतीचा हात दिला.

समाजसेवींना दिला आधार
अमरावती : इर्विन रूग्णालयात जाऊन तिचे सांत्वन केले. तिला सर्वतोपरी मदत केली. पारश्रीचे डॉ.श्रीगोपाल राठी यांनी जयश्रीला उपचाराकरिता दत्तक घेतले. तिच्यावर योग्य उपचार सुरू झाले. डॉक्टर व परिचारिकांनी जयश्रीची योग्य काळजी घेतल्याने तिच्या प्रकृतीत गतीने सुधारणा झाली. तिच्या आईचे हृदयविकाराने निधन झाल्याचा तिला धक्का बसला होता. मात्र, त्यातूनही वडिलांच्या आधाराने ती सावरली. बहिणी, जावई, आ. यशोमती ठाकूर, डॉ. श्रीगोपाल राठी व अन्य समाजसेवींनी तिला पुन्हा आधार दिला. आता ४३ दिवसांच्या उपचारानंतर जयश्री ठणठणीत बरी झाली आहे. मात्र, तिला जुअ‍ेनाईल शुगर (जन्मत: मधुमेह) असल्यामुळे तिला आयुष्यभर औषधोपचार घ्यावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जयश्रीला सोमवारी रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत काही दिवस तिच्यावर कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू राहणार आहेत. (प्रतिनिधी)

‘तिने’ जिंकली अर्धी लढाई : ४३ दिवसांनंतर पारश्री रुग्णालयातून सुटी
हे घेणार जयश्रीची काळजी
आ.यशोमती ठाकूर यांनी पुढाकार घेऊन जयश्रीला मदतीचा हात दिला. त्यांच्या माध्यमातून तिवसा पंचायत समितीचे सदस्य मंगेश भगोले, राजेश बिंड, संजय वसुले यांच्यासह मनीष पोकळे, जयश्रीचे जावई सुरेश दारोकार, राजेंद्र पोकळे, बहिण माधुरी दुधे (बडनेरा), कुऱ्हा पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी आर.एस.फुलाडी जयश्रीची काळजी घेणार आहेत.

जयश्रीच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली आहे. मात्र, तिला जन्मत:च मधुमेह असल्यामुळे तिला आयुष्यभर औषधोपचार घ्यावे लागतील. पारश्री रुग्णालयाकडून तिची योग्य काळजी घेतली गेल्याने तिने जिवनाची लढाई जिंकली आहे.
- डॉ. गोपाल राठी, पारश्री रुग्णालय.

Web Title: Defeat death, Jayashree returns home again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.